चंद्रपूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले असून, यात काँग्रेसने 7 जागांवर विजय मिळवत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली असली, तरी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलेली परखड मते आणि भद्रावतीमधील निकालाची जिल्ह्यात मोठी चर्चा होत आहे. जिल्ह्यात काँग्रेसने मुसंडी मारली असतानाच, भद्रावती नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपच्या उमेदवार वृषाली पांढरे यांनी काँग्रेसच्या बलाढ्य फळीला धूळ चारत केवळ एका मताने विजय मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. भद्रावतीची ही निवडणूक काँग्रेससाठी प्रतिष्ठेची होती, कारण येथे विजय वडेट्टीवार यांच्यासह खासदार प्रतिभा धानोरकर यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, काँग्रेसच्या या तगड्या आव्हानासमोर भाजपच्या वृषाली पांढरे यांनी मिळवलेला विजय ऐतिहासिक मानला जात आहे. या विजयाचे मुख्य सूत्रधार त्यांचे पुतणे आणि भाचे शिवा पांढरे ठरले. अनेकांचा विरोध झुगारून शिवा यांनी आपल्या मावशीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आणि मित्रमंडळींच्या मदतीने राबवलेल्या अचूक नियोजनामुळे काँग्रेसच्या गडाला खिंडार पाडले. या विजयानंतर राजकीय वर्तुळात या ‘मावशी-भाच्याच्या’ जोडीची विशेष चर्चा होत आहे. भद्रावतीमध्ये राजकीय समीकरणे अत्यंत चुरशीची होती. येथे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही मोठ्या पक्षांना मागे टाकत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रफुल्ल चटकी नगराध्यक्षपदी निवडून आले. अशा कठीण परिस्थितीतही भाजपच्या वृषाली पांढरे आणि गीता सावनकर यांनी आपल्या जागा निवडून आणत पक्षाची प्रतिष्ठा जपली आहे. आपल्या या यशाचे श्रेय वृषाली पांढरे यांनी पती विनोद पांढरे यांचा खंबीर पाठिंबा, शिवा पांढरे यांची मेहनत आणि प्रभागातील महिला व सहकाऱ्यांना दिले आहे. काँग्रेसच्या लाटेत केवळ एका मताने मिळवलेला हा विजय भाजपसाठी अत्यंत मोलाचा ठरला आहे.
