EC चा मतदान प्रक्रियेतील गोंधळ संपेना:मतदानाच्या दिवशीच टपाली मतदानाच्या मतपेट्या स्ट्राँगरूमबाहेर काढणार; नियोजनावर प्रश्नचिन्ह

राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मतदानाच्या दिवशीच मुंबईतील काही प्रभागांतील टपाली मतदानाच्या पेट्या स्ट्राँगरूमबाहेर काढण्याचे एक परिपत्रक जारी केल्यामुळे राजकीय पक्षांत एकच खळबळ माजली आहे. आयोग या प्रक्रियेंतर्गत टपाली मतदानाचे लिफाफे योग्य त्या प्रभागातच पडले किंवा नाही हे तपासून पाहणार आहे. पण विरोधी पक्षांनी ‘ही कसली लोकशाही?’ म्हणत आयोगाच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. साधारणतः मतदानाचा व मतमोजणीचा दिवस वेगवेगळा असतो. फार पूर्वी मतदान झाल्यानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात होत होती. त्यानंतर मध्यरात्री उशिरा किंवा दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत निकाल लागायचे. जोपर्यंत मतदान होत नाही, तोपर्यंत मतपेट्या उघडल्या जात नाहीत. यात पोस्टल मतदानाचाही समावेश असतो. पण आता मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 200 ते 206 च्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदानाच्या दिवशीच टपाली मतदानाच्या पेट्या उघडण्याचे निर्देश दिलेत. यामुळे एकच खळबळ माजली आहे. टपाली मतदान दुसऱ्या प्रभागात गेल्याचा संशय यासंबंधीच्या माहितीनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत प्रभाग क्रमांक 200 ते 206 साठी टपाली मतदानाची जबाबदारी निवडणूक आयोगावर होती. आयोगाने टपाली मतदानासाठी परेल भोईवाडा मराठी उ. प्रा. शाळा संकुल, परेल, मुंबई या ठिकाणी केंद्र ठरवले. मतदानाचा काळ 10, 11 व 12 जानेवारी असा निश्चित केला. त्यात टपाली मतपत्रिका संबंधित प्रभागाच्या मतदान पेटीत टाकणे अपेक्षित होते. पण आयोगाच्या देखरेखीअभावी काही लिफाफे चुकून अन्य प्रभागांमध्ये पडले. या घाईगडबडीमुळे मतमोजणीच्या दिवशी गोंधळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता आयोगाने हे लिफाफे असलेल्या मतपेट्या स्ट्राँगरूमबाहेर काढून त्या योग्य त्या प्रभागाच्या मतपेट्यांत टाकण्याची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाने आपल्या पत्रकात काय म्हटले आहे? आयोगाने आपल्या पत्रकात म्हटले आहे की, 10 जानेवारी ते 12 जानेवारी या तिन्ही दिवशी झालेले टपाली मतदान हे लिफाफ्यामध्ये बंद करून ते संबंधित प्रभागांच्या मतदान पेटीमध्ये पडणे आवश्यक होते. परंतु अनावधानाने घाईगडबडीत सदर मतदारांकडून ते लगतच्या अन्य प्रभागांच्या मतपेटीमध्ये टाकल्याबाबतची/ गेल्याबाबतची शक्यता नाकारता येत नाही. सबब मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी सुरुळीत पार पाडण्यासाठी उक्त दिनांकास झालेले टपाली मतदान हे प्रभागनिहाय मतपेटीतील मतदानाचा लिफाफा तपासून, तो लिफाफा त्याच प्रभागाच्या मतपेटीतील आहे किंवा कसे याबाबतची तपासणी करण्यासाठी आज 15 जानेवारी रोजी दुपारी 3 वा. सदर टपाली मतपत्रिकेच्या पेट्या स्ट्राँगरूममधून बाहेर काढण्यात येणार आहेत. तरी त्यासाठी आपण किंवा आपला टपाली मतपत्रिकेकरिता नेमणूक केलेला प्रतिनिधी यांना वरील नमूद वेळेत उपस्थित राहण्यासाठी आपल्या स्तरावरून सूचना द्यावात, असे आयोगाने संबंधित प्रभागांतील उमेदवारांना लिहिलेल्या एका पत्रात म्हटले आहे. ही कसली लोकशाही – उद्धव ठाकरे आयोगाच्या या पत्रावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, साधारणतः जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत मतपेट्या उघडल्या जात नाहीत असा दंडक आहे. त्यात पोस्टल मतदानही आले. पण आता प्रभाग क्रमांक 200 ते 206 च्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आज दुपारी मतदानाच्या दिवशीच दुपारी 3 वा. टपाली मतदानाच्या पेट्या उघड्याचे निर्देश दिलेत. तसे पत्र त्यांनी दिले आहे. ही कसली लोकशाही आहे? संविधान म्हणते मतदान करा आणि निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा. मुख्यमंत्री आपल्या घरगड्याला निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करत आहेत का? की निवडणूक आयुक्तांना काही कामच नाही. हा सर्व प्रकार धाक दडपशाहीचा आहे, असे ते म्हणालेत.

Leave a Comment

error: Content is protected !!