उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवरून राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. “महाराष्ट्रात दुःखद निधनानंतर निवडणूक बिनविरोध करण्याची कोणतीही परंपरा नाही. अपवादात्मक परिस्थिती वगळता राजकीय भूमिका घेऊनच निवडणुका लढवल्या जातात,” असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. सपकाळ यांच्या या भूमिकेमुळे बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार की गाजणार, याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी एका विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या बारामतीत विधानसभा मतदारसंघात 23 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने तीन दिवसांपूर्वीच या निवडणुकीची घोषणा केली. अजित पवारांच्या दुर्दैवी निधनामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल असा दावा केला जात होता. तसे सर्वच राजकीय पक्षांनी संकेतही दिले होते. त्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसने येथून अजित पवार यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विधानसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भूमिकेने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. नेमके काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ? महाराष्ट्रात दुःखद निधनानंतर बिनविरोध निवडणूक करण्याची कुठलीही परंपरा नाही. अपवादात्मक काही किरकोळ गोष्टी सोडल्या, तर सर्वसाधारणपणे ज्या ज्या ठिकाणी पोटनिवडणुका होतात, त्या ठिकाणी दोन्ही बाजुंनी निवडणूक लढली जाते. नांदेडमध्ये खासदार म्हणून वसंतराव चव्हाण हे निवडून आले होते. त्यांच्या मृत्युनंतर ज्या निवडणुका झाल्या, त्यात भाजपने आपला उमेदवार उतरवला होता. त्यामुळे अशा पद्धतीची परंपरा नाही, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणालेत. निवडणुका झाल्यास त्यात वावगे काही नाही अजितदादांचा मृत्यू हा दु:खद आणि धक्कादायक नक्कीच आहे. मात्र निवडणुकीच्या अनुषंगाने यामध्ये अशी परंपरा नसल्यामुळे आणि हा एक राजकीय परिस्थिती असल्यामुळे यामध्ये निवडणुका होण्यामध्ये कुठल्या प्रकारची हरकत नसावी. सर्वसाधारणपणे राजकीय भूमिका घेऊनच निवडणुका होतात. यावेळी देखील निवडणुका झाल्या तर त्यात चुकीचे किंवा वावगे काही नाही, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणालेत. शरद पवार गटाशी कोणतीही चर्चा नाही विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बारामती पोटनिवडणुकीत आपला उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला आहेत. यावर भाष्य करताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, राष्ट्रवादी शरद पवार गटाशी थेट स्वरुपात तशा पद्धतीची चर्चा झालेली नाही. ऐकीव माहितीच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. निवडणूक बिनविरोध होण्याला विरोध असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. अशापद्धतीची परंपरा नाही. शेवटी राजकीय भूमिका यामध्ये महत्त्वाची आहे. आता राजकारण बरेच पुढे चालले गेलेले आहे. त्यामुळे पक्ष म्हणून काही भूमिका घ्याव्या लागतात.
