Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

देवेंद्र फडणवीस अन् त्यांची चोर कंपनी हरली:मतदानाच्या दिवशीच टपाली मतदानाच्या पेट्या उघडण्यात येत आहेत, उद्धव ठाकरे यांचा दावा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदानावेळी बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याच्या मुद्यावर तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. आम्ही आयोगाला दुबार मतदारांचे गठ्ठेच्या गठ्ठे दिले. त्यानंतर आता बोटांवरील शाई पुसली जात आहे. हा प्रकार बोटांवरील शाई पुसण्याचा नव्हे तर लोकशाही पुसण्याचा आहे. देवेंद्र फडणवीस व त्यांची चोर कंपनी हरली आहे. हरलेल्या मानसिकतेतूनच त्यांना जिंकण्यासाठी असे गैरप्रकार करावे लागत आहेत, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दुपारी एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यात त्यांनी भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी मतदानाच्या दिवशीच टपाली मतदानाच्या पेट्या उघडल्या जात असल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, भाजप निवडणूक जिंकण्यासाठी जिवाचा आटापिटा करत आहे. बोटावरील शाई पुसली जात आहे. असे प्रकार यापूर्वी केव्हाच घडले नव्हते. निवडणूक आयोग व निवडणूक आयुक्त कशाचा पगार घेत आहेत? महापालिका निवडणूक 9 वर्षांनी होत आहेत. गतवर्षी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका झाल्या. पण मतदारयाद्यांत कुठेही सुधारणा झाली नाही. निवडणूक आयुक्त कशाचा पैसा खात आहेत? मतदानाच्या दिवशीच मतमोजणी? उद्धव ठाकरे म्हणाले, साधारणतः मतदानाचा व मतमोजणीचा दिवस वेगवेगळा असतो. फार पूर्वी मतदान झाल्यानंतर तत्काळ मतमोजणीला सुरुवात होत होती. त्यानंतर मध्यरात्री किंवा दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत निकाल लागायचे. जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत मतपेट्या उघडल्या जात नाहीत असा दंडक आहे. त्यात पोस्टल मतदानही आले. पण आता प्रभाग क्रमांक 200 ते 206 च्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आज दुपारी मतदानाच्या दिवशीच दुपारी 3 वा. टपाली मतदानाच्या पेट्या उघड्याचे निर्देश दिलेत. तसे पत्र त्यांनी दिले आहे. ही कसली लोकशाही आहे? संविधान म्हणते मतदान करा आणि निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा. मुख्यमंत्री आपल्या घरगड्याला निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करत आहेत का? की निवडणूक आयुक्तांना काही कामच नाही. हा सर्व प्रकार धाक दडपशाहीचा आहे. यावेळी सोशल मीडियात बऱ्याच गोष्टी उघड झाल्या आहेत. मी परवा ठाण्यात गेलो होतो. आमच्या उमेदवारांना कोट्यवधींचे आमिष दाखवण्यात आले. साम दाम दंड भेद कशासाठी? महायुतीकडे कर्तृत्व काहीच नाही. त्यामुळे ते सत्तेसाठी वाट्टेल ते करत आहेत. वनमंत्र्यांनाही आपले मतदान केंद्र 4 तास सापडले नाही. ही सध्याची स्थिती आहे. या सगळ्या गोष्टींवर इलाज करायचा असेल तर निवडणूक आयुक्तांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. कारण, हे बसल्या जागी फुकट जनतेचा पैसा खात आहेत. सत्ताधाऱ्यांची लाचारी करत आहेत, उद्धव ठाकरे म्हणाले. पुरुषाच्या नावापुढे बाईचा फोटो उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मतदान हा आपल्याला काही नवा विषय नाही. आता मतदान केले का? हा प्रश्न विचारण्याऐवजी शाई पुसली का? असा प्रश्न विचारला पाहिजे. यंदा भाजप व त्यांच्या मित्रमंडळींनी पुरेपुर प्रयत्न केला किंवा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. त्यात दुबार मतदान, ईव्हीएमचा खेळ याचा समावेश आहे. पुरुषाच्या नावापुढे बाईचा फोटो आढळत आहे. या गोष्टी आम्ही मोर्चा काढून निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यानंतर आता शाई पुसल्या जाण्याच्या तक्रारी येत आहेत. कल्याण – डोंबिवलीमध्ये मतदान केंद्राबाहेर भाजपच्या उमेदवारांच्या नावाच्या पाट्या ठेवून मतदान केंद्राबाहेर केंद्र चालवले जात आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी काही रेकॉर्डिंगही ऐकवले. ते म्हणाले, रवींद्र नामक व्यक्तीच्या नावापुढे बाईचा फोटो आहे. मंत्री गणेश नाईक यांचे मतदान केंद्र फरार झाले आहे. ठाण्यात कुणाचे मतदान कुठे आहे हे कळायलाच मार्ग नाही. तिकडे मतदान केंद्रांत भाजपच्या उमेदवारांच्या नावाच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. यावर आयोगाला काय म्हणायचे आहे? मोदींना सगळीकडे गोंधळ घालून सत्ता मिळवण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन हवे आहे. वाट्टेल ते करा, पण सत्ता काबिज करा. दुबार मतदारांकडून किती हमीपत्र घेतले? आम्ही आयोगाला दुबार मतदारांचे गठ्ठेंच्या गठ्ठे दिले. आता बोटांवरील शाई नव्हे लोकशाही पुसली जात आहे. तुम्ही मार्करने शाई लावा किंवा कशानेही लावा. शाई कशी पुसली जाते? हा आमचा प्रश्न आहे. आयोग दुबार मतदारांकडून दुसऱ्यांदा मतदान करणार नाही याचे हमी पत्र घेणार होते. असे किती हमीपत्र त्यांनी भरून घेतले आहेत? असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही सत्ताधाऱ्यांच्या खोटेपणाचे कुभांड फोडत आहोत. अन्यथा आम्ही एवढ्या ताठ मानेने त्यांच्यापुढे उभे राहिलोच नसतो. त्यांचा जो काही एकूण दरोडा घालण्याचा प्रयत्न लोकांपुढे उघडा पाडत आहोत. दुबार मतदान असेल, धाक दडपशाही असेल, पैसे वाटताना त्यांनीच एकमेकांची लोकं पकडली आहेत. देवेंद्र फडणवीस व त्यांची सगळी चोर कंपनी हरली आहे. हरलेल्या मानसिकतेमुळे त्यांना असे गैरप्रकार करावे लागत आहेत. त्यांनी आमच्यासारखे लोकांपुढे जाऊन दाखवावे. निवडणूक आयोगही संविधान विरोधी आहे. त्यामुळे आयुक्तांवर कारवाई झाली पाहिजे. त्यांचा संपूर्ण स्टाफ दिवसभर काय करतो याचा छडा आता लावावा लागेल, असे ठाकरे म्हणाले.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!