मुंबई महापालिका निवडणुकीत बोटाला लावण्यात येणारी शाई तत्काळ निघत असल्याचा एक व्हिडिओ काँग्रेसने पोस्ट केला आहे. त्यात नेलपॉलिश रिमुव्हरने ही शाई अगदी सहजपणे निघत असल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षांनी या प्रकारावर टीकेची झोड उठवली आहे. निवडणूक आयोगाने दुबार व बोगस मतदानाला हातभार लावण्यासाठी ही शाई वापरली काय? असा सवाल या प्रकरणी उपस्थित केला जात आहे. राज्यात आज मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी या प्रकरणी एक व्हिडिओ पोस्ट करून मतदानाच्या प्रक्रियेत बोटाला लावण्यात येणारी शाई नेलपॉलिश रिमुव्हरने निघत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे. यानंतर एकच खळबळ माजली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत नेलपॉलिश रिमुव्हरने बोटावरची शाई जाते याचे हे प्रात्यक्षिक. राज्य निवडणूक आयोगाकडून यावेळी प्रचंड गैरव्यवस्थापन झाले आहे. हा प्रकार दुर्दैवी आहे. शाईची टेस्टींग कोणी केली? अगोदरच काळजी घेतली नव्हती का? अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. अत्यंत लाजिरवाणी गोष्ट – वर्षा गायकवाड काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्या म्हणाल्या, आज सकाळपासून आम्हाला असे अनेक रिपोर्ट मिळत आहेत की, मतदान झाल्याचे दाखवण्यासाठी वापरली जाणारी मार्कर शाई सहजपणे पुसली जात आहे. माझे सहकारी सचिन सावंत व त्यांच्या पत्नीने एका व्हिडिओद्वारे दाखवून दिले आहे की, ही शाई एसीटोन किंवा नेल पॉलिश रिमूव्हरने किती सहजपणे पुसली जाऊ शकते. यावेळच्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या व्यवस्थापनात जबाबदारी आणि पारदर्शकतेबद्दल अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मतदारांना शेवटच्या क्षणी दिल्या जाणाऱ्या लाचखोरीकडे दुर्लक्ष केले जात आहे, मतदारांची नावे गायब आहेत, राज्य निवडणूक आयोगाची वेबसाइट क्रॅश झाल्यामुळे मतदारांना त्यांची नावे शोधणे कठीण होत आहे, आणि आता ही शाई देखील सहज पुसली जात आहे. आपल्या लोकशाही प्रक्रियेवरील लोकांचा विश्वास कोणत्याही परिस्थितीत जपला गेला पाहिजे, परंतु निवडणूक आयोग आणि बीएमसीला याची काहीही पर्वा नसल्याचे दिसत आहे. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, असे गायकवाड यांनी म्हटले आहे. हा तर बोगस मतदानाला हातभार – रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणी राज्य निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवली आहे. बोटाची शाई निघणे हे बोगस मतदानाला हातभार लावणारा असल्याचे ते म्हणालेत. ते म्हणाले, मतदानानंतर बोटाला लावलेली शाई अनेक दिवस तशीच रहात असल्याचं आतापर्यंतच्या अनेक निवडणुकींमध्ये बघितलंय. पण आज ही लावण्यात आलेली शाई लगेचच पुसली जात असून अशा प्रकारची शाई वापरणं म्हणजे दुबार आणि बोगस मतदानासाठी निवडणूक आयोगानेच लावलेला हा हातभार नाही का? की बोगस मतदानाच्या माध्यमातून जिंकण्यासाठी महाशक्तीच्या दबावातून अशी शाई वापरण्यात आली की या शाईमध्येही भ्रष्टाचार झाला? याचा खुलासा निवडणूक आयोगाने करावा. तसंच अनेक ठिकाणी दुबार मतदार असूनही तिथं डबल स्टार दिसत नाही, याचा अर्थ काय? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. ईसीचे स्वतःचे काही अस्तित्व आहे की नाही? – विजय कुंभार आप नेते तथा सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनीही या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बोटावरची शाई पुसली जाणं, व्हीव्हीपॅट नसणं, ऐनवेळी पाडूचा वापर, दुबार मतदार,एकाचं उमेदवारांने दोन ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवणं, मतदारांना केंद्र न सापडणं, ईव्हीएम बंद पडणं, त्यात बिघाड होणं, पैशांच्या वाटपाला खुली मुभा या आणि अशा अनेक गोष्टी निवडणूक आयोगाच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवत आहेत. त्यामुळे आधीच संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. आयोगाने “आधीपासूनच ते तसंच सुरू आहे” या शब्दांत नागरिकांची बोळवण करणं योग्य नाही. निवडणूक आयोगाचं स्वतःचं असं काही अस्तित्व आहे की नाही? आयोगाने निवडणूक विश्वासार्ह, सुरक्षित आणि निर्दोष कशी पार पडेल याकडे लक्ष दिलं पाहिजे. थातुरमातूर कारणांच्या मागे लपणं योग्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे. विजय कुंभार यांनी बोटाची शाई पुसण्यासंबंधीचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. त्यात एक तरुण काही महिलांच्या बोटावरील शाई पुसताना दिसून येत आहे.
