भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमधील भाजपचा विजय हा विकास व महायुतीवरील विश्वासाचा असल्याचे मत व्यक्त केले आहे. हे विश्वासाचे मत आहे. विकासाचे मत आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व महायुतीवरील विश्वासाचे मत आहे. भाजप व शिवसेनेची महायुती दोन तृतीयांश बहुमताने व 51 टक्के व्होट शेअरने मुंबई महापालिकेच्या सत्तेत येईल, असे ते म्हणाले. मुंबई महापालिकेत भाजप – शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तब्बल 25 वर्षांनंतर मुंबईवरील ठाकरे गटाची सत्ता संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे कल असेच कायम राहून महायुतीचा विजय होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले, हे विश्वासाचे मत आहे, विकासाचे मत आहे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व महायुतीवरील विश्वासाचे मत आहे. केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील फडणवीस सरकार हेच महाराष्ट्राचा विकास करू शकतात हा त्याचा कल आहे. हा कल असाच सुरू राहील. भाजप व शिवसेनेची महायुती दोन तृतीयांश बहुमताने व 51 टक्के व्होट शेअरने मुंबई महापालिकेच्या सत्तेत येईल. नागपूर महापालिकेतही जनतेने देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या विकासाच्या भूमिकेवर मत दिले. विकसित नागपूरला मत दिले आहे. संपूर्ण महाराष्ट्राने विकासाला मत दिले. हा प्राथमिक अंदाज आहे. सायंकाळी 5 नंतर संपूर्ण निकाल स्पष्ट होईल. तेव्हा अधिक बोलता येईल, असे ते म्हणाले. भाजपला दोन तृतीयांश बहुमत मिळेल महाराष्ट्रात एकूण नगरसेवकांपैकी 51 टक्के नगरसेवक हे भाजप व महायुतीचे असतील. व भाजपला दोन तृतीयांशहून अधिक बहुमत मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबईच्या विकासाचे व्हिजन तयार केले. एकनाथ शिंदे व त्यांनी विकसित मुंबई करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून मुंबईला पाठबळ दिले. त्यामुळे तेच मुंबईचा विकास करू शकतात अशी लोकांची भावना आहे, असे बावनकुळे म्हणाले. भाजपची गाडी 100 च्या स्पीडने निघाली ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या निवडणुकीची रचना केली. माझ्यावरही या निवडणुकीचा प्रभार होता. आम्ही तिघांनीही समन्वय साधून काम केले. महाराष्ट्राचे सरकार व केंद्रातील मोदी सरकार यांच्या विकासाच्या योजना. तथा संघटनेची भूमिका. ही दोन चाके जोडीने चालली. परिणामी, आमची गाडी 100 च्या स्पीडने निघाली. आम्हाला लातूरमध्ये काहीसे नुकसान सोसावे लागले. तिथे आम्ही 22 जागांवर थांबलो. तिथे काँग्रेस 40 च्या वर गेली. आम्ही यावर चिंतन करू. चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी ईव्हीएमला दोष देणाऱ्या ठाकरे बंधूंचाही समाचार घेतला. ज्या ठिकाणी राज व उद्धव ठाकरे यांचे उमेदवार निवडून आले तिथे ईव्हीएम चांगल्या होत्या. स्पेशल होती. आम्ही जिथून निवडून आलो तिथे बोगस होती. हे लोकांना पटत नाही. लोकांना विकास पटतो. महाराष्ट्रात पुढे केवळ विकासाचे राजकारण होईल, असे ते म्हणाले.
