Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

सत्यजीत तांबेंचा युवा नेत्यांवर अप्रत्यक्ष प्रहार:पराभवाचं आत्मपरीक्षण न करता संशयाचं राजकारण? म्हणाले- निकाल स्वीकारण्याची परिपक्वता हवी

राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल एकामागोमाग जाहीर होत असताना राजकीय वातावरण अधिक तापताना दिसत आहे. काही विरोधी पक्षांतील युवा नेत्यांनी आपल्या पराभवाचे खापर थेट निवडणूक प्रक्रियेवर फोडण्यास सुरुवात केल्याचं चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या मतामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. तांबेंनी थेट कोणाचं नाव घेतलेलं नसले तरी, त्यांच्या वक्तव्याचा रोख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडे असल्याची चर्चा रंगू लागली आहे. महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश मिळत असल्याचं चित्र समोर येत आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षांना अनेक ठिकाणी धक्कादायक निकालांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत काही युवा नेत्यांकडून निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित केले जात असल्याचं दिसून येत आहे. ईव्हीएम, मतदानाची टक्केवारी, मतमोजणीची प्रक्रिया यांसारख्या मुद्द्यांवर संशय व्यक्त करत पराभवाचं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका होत आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी केलेलं वक्तव्य विशेष लक्ष वेधून घेत आहे. आपल्या ट्विटमध्ये आमदार सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, महापालिका निवडणुकीचा निकाल समोर येत असतानाच अनेक पक्षांमधील ‘युवा नेते’ आपल्या अपयशाचे खापर थेट निवडणूक प्रक्रियेवर फोडत आहेत. या एका वाक्यातूनच त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर कठोर टीका केली आहे. निवडणुकीत अपयश आल्यानंतर आत्मपरीक्षण करण्याऐवजी प्रक्रियेवरच बोट दाखवणं ही गंभीर बाब असल्याचं त्यांच्या म्हणण्यातून स्पष्ट होतं. तांबे पुढे म्हणतात की, अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे केवळ निवडणूक यंत्रणाच नाही, तर आपल्या पक्षातीलच अनेक मेहनती कार्यकर्ते आणि उमेदवार यांचाही अपमान होतो. हे नेते आपल्या पक्षातीलच त्या उमेदवारांचा अपमान करत आहेत, ज्यांनी वर्षानुवर्षे मेहनत करून जनतेचा विश्वास संपादन केला आणि निवडणुकीत विजय मिळवला, असा ठाम आरोप त्यांनी केला आहे. या विधानातून पक्षांतर्गत अस्वस्थताही समोर येत असून, वरिष्ठ आणि तळागाळातील कार्यकर्त्यांच्या संघर्षाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. लोकशाहीच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणं किती घातक आहे, याकडेही आमदार तांबे यांनी लक्ष वेधलं आहे. केवळ आपल्या मनासारखा निकाल लागत नाही म्हणून लोकशाहीच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, असं म्हणत त्यांनी थेट इशारा दिला आहे. निवडणूक ही लोकशाहीची सर्वात महत्त्वाची प्रक्रिया असून, ती पारदर्शक आणि विश्वासार्ह आहे, यावर विश्वास ठेवणं प्रत्येक राजकीय नेत्याचं कर्तव्य असल्याचं त्यांच्या वक्तव्यातून अधोरेखित होतं. निकाल स्वीकारण्याची राजकीय परिपक्वता तांबे यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडताना सांगितलं की, अशा आरोपांमुळे केवळ विजयी उमेदवारांचा नाही, तर मतदान करणाऱ्या सामान्य नागरिकांचाही अपमान होतो. जनतेने मतदानाचा हक्क बजावून दिलेला कौल नाकारला जाणं म्हणजे लोकशाही मूल्यांनाच तडा देण्यासारखं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. निकाल स्वीकारण्याची राजकीय परिपक्वता नसेल, तर लोकशाही व्यवस्था कमकुवत होण्याचा धोका निर्माण होतो, असा इशाराही त्यांनी अप्रत्यक्षपणे दिला आहे. नव्या पिढीच्या नेतृत्वाला आत्मपरीक्षणाचा सल्ला राजकीय मतभेद, टीका-प्रत्युत्तर ही लोकशाहीचीच अंगं असली, तरी निवडणूक प्रक्रियेवर अविश्वास दाखवणं योग्य नाही, असा स्पष्ट संदेश आमदार सत्यजीत तांबेंच्या या ट्विटमधून दिला जात असल्याचं मानलं जात आहे. थेट नाव न घेता ‘युवा नेते’ असा उल्लेख करत त्यांनी राज्यातील नव्या पिढीच्या नेतृत्वाला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिल्याचं बोललं जात आहे. महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होत असतानाच आलेल्या या प्रतिक्रियेमुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात शब्दयुद्ध आणखी तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!