बड्या उद्योगपतीने फडणवीसांचा केला पंतप्रधान म्हणून उल्लेख:’स्लीप ऑफ टंग’ने स्वतः मुख्यमंत्रीही झाले आश्चर्यचकित; कुठे घडला प्रसंग?

काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देशात नेतृत्व बदल होऊन भाजपचा एक मराठी माणूस पंतप्रधान होईल असा दावा केला आहे. त्यातच एका बड्या उद्योगपतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख चक्क पंतप्रधान म्हणून केला. त्यांनी बोलण्याच्या ओघात हे भाष्य केले असले तरी त्याची खमंग चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुंबईत आज ‘ॲन्युअल वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम कॉन्फरन्स 2025’ झाली. या परिषदेत बोलताना उद्योगपती सज्जन जिंदाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख पंतप्रधान म्हणून केला. त्यांनी भाषणाच्या ओघात फडणवीसांचा उल्लेख पंतप्रधान असा केला. पण गडबड लक्षात येताच त्यांनी सॉरी म्हणत आपली चूक दुरुस्त केली. ते म्हणाले, पंतप्रधान मला बोलले, आपल्याला 500 दशलक्ष टन स्टीलची निर्मिती करायची आहे. आपल्याला 300 दशलक्ष टनांवर थांबायचे नाही. आपण चीनहून कमी नाही. आपल्याला प्रत्येक गोष्टीत स्वावलंबी व्हायचे आहे. तोंडातून निघालेला शब्द खरा ठरो आपल्याला जगासाठी स्टीलची निर्मिती करायची आहे. देशांतर्गत उत्पादन वाढवायचे आहे. मी तुमचा फार वेळ घेणार नाही. कारण, आज आपण पंतप्रधानांना ऐकण्यास आलो आहोत, असे जिंदाल म्हणाले. पण बोलण्याच्या ओघात आपली जीभ घसरल्याचे लक्षात येताच त्यांनी पंतप्रधान शब्द वगळून मुख्यमंत्र्यांना ऐकायला आलोय, असे स्पष्ट केले. माझ्या तोंडातून चुकीने शब्द निघाला, पण एक दिवस ते पंतप्रधान होतील. आपल्या हिंदू संस्कृतीत असे म्हटले जाते की, एखादा शब्द तोंडातून निघाला असेल तर ते प्रत्यक्षातही घडते. आपल्या जीभेवर सरस्वती विराजमान असते, असे जिंदाल म्हणाले. निव्वळ योगायोग की खरेच काहीतरी घडतंय उल्लेखनीय बाब म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांनी देशातील नेतृत्व बदलाविषयी केलेले विधान आणि त्यानंतर सज्जन जिंदाल यांच्या तोंडातून पंतप्रधान म्हणून झालेला देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख हा केवळ योगायोग आहे की, इतर काही घटना घडणार आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशाचे पंतप्रधान कोण होणार? अशी चर्चा रंगते तेव्हा प्रामुख्याने फडणवीसांचे नाव घेतले जाते. फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेत. ते नागपूरचे आहेत. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रासारख्या विकसित राज्यात मधील अडीच वर्षे सोडली भाजपची सलग तिसऱ्यांदा सत्ता आली. ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. त्यामुळे त्यांचे नाव अमित शहा व योगी आदित्यनाथ यांना मागे टाकून पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी आले आहे. आत्ता पाहू काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण? 19 डिसेंबर रोजी देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल. भारताचा पंतप्रधान बदलेल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल. ती व्यक्ती भाजपचीच असू शकते, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते. त्यांनी यासाठी अमेरिकेत सार्वजनिक होणाऱ्या एपस्टीन फाईल्सचा दाखला दिला होता. या फाईल्स आज सार्वजनिक होणार आहेत. त्यात काही भारतीय नेत्यांची नावे येण्याची शक्यता आहे. असे झाले तर भारताच्या केंद्र सरकारमध्ये मोठा हल्लकल्लोळ माजण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!