राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या पंढरपूर येथील आंदोलनस्थळी आज भाजप कार्यकर्त्यांकडून थेट गोमूत्र आणि चंद्रभागेचे तीर्थ शिंपडून ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळवणवार यांनी हा प्रकार केला आहे. सरकारी कारखाने, बँका आणि दूध संघ डबघाईला आणणाऱ्या लोकांच्या आंदोलनामुळे विठ्ठलाची पंढरी अशुद्ध झाली होती, तसेच या आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी होऊन भाविकांची गैरसोय झाली, असा आरोप करत भाजपने हे ‘गोमूत्र शुद्धीकरण’ नाट्य घडवून आणले. रोहित पवारांवर कर्माचा हिशोब उलटला- भाजप नेत्याचा घणाघात या संपूर्ण प्रकारावर भाजप अहिल्यानगर दक्षिणचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पोटरे यांनी प्रतिक्रिया देत रोहित पवारांवर जोरदार निशाणा साधला. “राजकारणात कर्माचा हिशोबकधी ना कधी चुकता करावाच लागतो, हे आज सिद्ध झाले, असे पोटरे म्हणाले. त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील एका जुन्या घटनेची आठवण करून दिली. त्या वेळी कर्जत नगरपंचायत निवडणुकीत सत्तेचा गैरवापर करून भाजप उमेदवारांवर दबाव आणला गेला होता. त्याचा निषेध म्हणून भाजप नेते राम शिंदे यांनी कर्जत येथील धाकटी पंढरी समजल्या जाणाऱ्या गोदड महाराज मंदिरासमोर ‘मौन व्रत’ आंदोलन केले होते. रोहित पवारांच्या जुन्या ‘स्टंट’ची झाली पुनरावृत्ती- सचिन पोटरे सचिन पोटरे यांनी पुढे सांगितले की, राम शिंदे यांचे आंदोलन संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमदार रोहित पवार यांच्या सांगण्यावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोदड महाराज मंदिर परिसरात गोमूत्र शिंपडून ‘पवित्र’ करण्याचा स्टंट केला होता. आज तेच कर्म फिरून रोहित पवारांवर उलटले आहे. नेहमी शेतकरी विरोधी भूमिका घेणाऱ्या आणि शेतकऱ्यांचे कारखाने हडप करणाऱ्या रोहित पवारांनी पंढरपुरात जिथे उपोषण केले, त्याच जागेवर आज भाजप नेते माऊली हळवणवार यांनी गोमूत्र शिंपडून त्या जागेचे शुद्धीकरण केले आहे. संतांच्या भूमीत राजकीय संघर्ष राजकारणात जय-पराजय, आरोप-प्रत्यारोप आणि संघर्ष सुरूच राहतात, मात्र संतांची भूमी, श्रद्धास्थाने आणि जनभावनांचा आदर राखणे हे सर्वच राजकीय नेत्यांचे कर्तव्य आहे. काळ बदलतो, परिस्थिती बदलते; पण कर्माचे फळ मात्र प्रत्येकाला कधी ना कधी भोगावे लागते, असा टोला भाजप नेत्यांनी रोहित पवारांना लगावला. पंढरपुरातील या गोमूत्र शिंपडण्याच्या प्रकारामुळे आता महाविकास आघाडी आणि महायुतीमधील राजकीय वाद आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
