रब्बी हंगामात पडणारी थंडी ही पिकांच्या वाढीसाठी पोषक ठरते. थंड हवामानामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो, बाष्पीभवन कमी होते आणि पिकांची मुळांची वाढ मजबूत होते. यामुळे उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. मात्र, हीच थंडी अती झाली किंवा व्यवस्थापनात त्रुटी राहिल्यास उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. तालुक्यात रब्बी हंगामासाठी एकूण २६ हजार ९०२ हेक्टर क्षेत्र आहे.पैकी आतापर्यंत सुमारे १६ हजार ७५७ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. यंदाच्या हंगामात आतापर्यंत जवळपास ७५ टक्के रब्बीच्या पेरणीचे काम झालेले असून, एखाद्या आठवड्या पर्यंत उर्वरित क्षेत्रावरील पेरण्याही पूर्ण होऊन १०० टक्के होतील. थंडीचा सर्वाधिक फायदा गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, कांदा या पिकांना होतो. या पिकांमध्ये थंड वातावरणात फुटवे चांगले येतात. पाणी शिवारापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा यावर्षी अंजनी धरण व गिरणा धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेले असून या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गिरणेचे आवर्तन शेत शिवारापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. तर अंजनीचे पाणी सिंचनासाठी या दोन्हींचा उपयोग रब्बी क्षेत्रासाठी केला जाऊ शकतो, परिणामी रब्बी हंगामातील उत्पन्नात वाढ होऊ शकते असा अंदाज आहे. ज्वारी १ हजार ५६९ हेक्टर, गहू २ हजार ५८० हेक्टर, मका ६ हजार ९४५ हेक्टर, हरभरा २ हजार ४६३ हेक्टर, रब्बी कांदा ३ हजार २०० हेक्टर याप्रमाणे आतापर्यंत रब्बी पेरण्या झालेल्या आहेत.