आमदारांना पळवणारे आता नगरसेवकांसाठी का घाबरले?:शिंदेंना फडणवीसांच्या राजवटीचीही भीती वाटतेय, राऊतांचा बोचरा प्रहार

महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता महापौर कोणाचा होणार? यावरून राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. “ज्यांनी स्वतः शिवसेनेचे आमदार फोडले, त्यांना आज स्वतःच्या नगरसेवकांची भीती वाटतेय, ही महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी ‘हास्यजत्रा’ आहे,” अशा शब्दांत राऊतांनी उपरोधिक टोला लगावला. नगरसेवकांना मुंबईतील हॉटेल्समध्ये ठेवण्याच्या निर्णयाची खिल्ली उडवताना राऊत म्हणाले की, “आमदारांना घेऊन ते सुरतला सुरक्षित ठिकाणी गेले होते. मग नगरसेवकांनाही सुरत किंवा अहमदाबादला न्यायला हवे होते. त्यांना मुंबईतच का कोंडून ठेवले आहे? स्वतःच्या राज्यात उपमुख्यमंत्री असतानाही जर नगरसेवक पळवले जातील किंवा त्यांचे अपहरण होईल अशी भीती वाटत असेल,तर ही महाराष्ट्राच्या राजकारणीतील फार मोठी हास्यजत्रा आहे. मराठी अस्मितेची मशाल अजूनही धगधगतेय हॉटेलमध्ये असलेल्या नगरसेवकांबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, “तुम्ही या नगरसेवकांना किती काळ कोंडून ठेवणार? हे नगरसेवक मूळचे शिवसैनिक आहेत. त्यांच्या मनात आजही मराठी अस्मितेची मशाल धगधगत आहे. भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही, हे जवळजवळ सर्वांनीच ठरवले आहे. येणाऱ्या काळात काय होते ते बघुयात.” शिवसैनिकाच्या मनात मुंबईबद्दल वेगळी भावना संजय राऊत म्हणाले, शिंदे गटातील निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये बरेच नवीन चेहरे आहेत. ते मूळचे शिवसैनिकच आहेत. शिवसैनिकाच्या मनात मुंबईबद्दल वेगळी भावना आहे. त्यामुळे भाजपचा महापौर होऊ देऊ नये, असे सगळ्यांच्या मनात विचार असल्याचे आमच्या लक्षात आलेले आहे. तुम्हीही कितीही कोंडून ठेवले, तरी संपर्काची अनेक साधने असतात, त्यानुसार संदेश येतच असतात. पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत शिंदे गटातील नगरसेवकांची ठाकरेंची सत्ता स्थापन होऊ शकते? असा प्रश्न राऊतांवर विचारला असता ते म्हणाले, मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधुंचा व्हावा, यापेक्षा भाजपचा होऊ नये ही सगळ्यांची भावना आहे. देवाची इच्छा असेल, शिवसेनेचा महापौर बसू शकतो, असे उद्धव ठाकरे यांनी काल सांगितले. काल मी सकाळी राज ठाकरेंची भेट घेतली. दोन्ही भावांमध्ये मोबाईलवरून चर्चा झाली. अनेकांशी चर्चा सुरू आहे. आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालींकडे पाहत आहोत, पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. बहुमत हे चंचल असते संजय राऊत पुढे म्हणाले, निवडणुकीत आलेले आकडे समसमान आहेत. चारचा फरक आहे. प्रचंड ताकद, प्रचंड पैसा, सत्ता याचा वापर करून त्यांना फक्त चारचे बहुमत मिळाले आहे. बहुमत कितीही मोठे किंवा छोटे असू द्या. बहुमत हे चंचल असते. ते इथून तिथे, तिथून इथे कधीही सरकू शकते. हा एकखांबी डोलारा नरेंद्र मोदींच्या करंगळीवर उभा आहे. कोंडून ठेवलेल्या नगरसेवकांची सुटका करा देवेंद्र फडणवीस यांनी ‘महायुतीचा महापौर बसणे ही देवाची इच्छा’ असल्याचे म्हटले होते. त्यावर उत्तर देताना राऊत म्हणाले, महायुतीचा महापौर बसला असता, तर त्यांच्या सहकारी गटाने २९ नगरसेवक कोंडून ठेवले नसते. याच्यावर आमच्या देवाभाऊंचे काय म्हणणे आहे? कोंडून ठेवलेल्या नगरसेवकांची सुटका करा. त्यांचे नातेवाईक अपहरण झाले म्हणून तक्रार देऊ शकतात. फडणवीस वेताळासारखे हट्टी देवेंद्र फडणवीस दावोसला गेले असले तरी त्यांचे लक्ष मुंबईच्या राजकारणातच आहे. ते वेताळासारखे हट्टी आहेत, पण त्यांना तरी हे मान्य होईल का की अमित शाह यांच्या पक्षाचा महापौर बसवावा? कायदा सुव्यवस्थेचे राज्य नाही, हेच एकनाथ शिंदेंनी नगरसेवकांना लपवून ठेवून सिद्ध केले आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

Leave a Comment

error: Content is protected !!