निवडणूक आयोग ताटाखालचे मांजर:प्रतिमा धुळीस मिळवली, संजय राऊतांची आक्षेपार्ह भाषेत टीका; नार्वेकरांवर कारवाई न केल्याने संताप

राज्यातील २९ महापालिका निवडणुकीत ६४ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य निवडणूक आयोगावर अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत टीका केली आहे. “निवडणूक आयोग ताटाखालचे आहे आणि त्यांनी आपली प्रतिमा धुळीस मिळवली आहे,” अशा शब्दांत संताप व्यक्त करत राऊतांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संजय राऊत यांच्या या विधानामुळे वाद होण्याची शक्यता आहे. ईव्हीएमवर ‘नोटा’चा पर्याय असताना कायदेशीररीत्या कोणतीही निवडणूक बिनविरोध निवड कशी? असा सवालही संजय राऊतांनी यावेळी केला. संजय राऊत यांनी बिनविरोध निवडणुकीच्या कायदेशीर वैधतेवर हल्ला चढवला. “निवडणूक आयोगाने कसला अहवाल मागवला आहे? ईव्हीएमवर ‘नोटा’चे बटण असते, ते दाबण्याचा अधिकार प्रत्येक मतदाराला आहे. नोटा हा देखील एक उमेदवार असून कायद्याने त्याला अधिकार दिले आहेत. अशा परिस्थितीत निवडणूक बिनविरोध करणे हा मतदारांच्या अधिकारावर गदा आणणारा प्रकार आहे,” असे राऊत म्हणाले. निवडणूक आयोगाने प्रतिमा धुळीस मिळवली तसेच राहुल नार्वेकर यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई न केल्यासंदर्भात विचारले असता संजय राऊत यांनी खालच्या शब्दांत निवडणूक आयोगावर टीका केली. “निवडणूक आयोग गां* आहे. हिंमत पाहिजे. तुम्ही संवैधानिक पदावर बसलेले असतात. कार्यालयात टी एन शेषन यांचा फोटो लावा आणि त्यांच्याप्रकारे काम करण्याचा प्रयत्न करता. नाहीतर लोक तुम्हाला गां* किंवा ताटाखालचं मांजरच म्हणणार. निवडणूक आयोगाने त्यांची प्रतिष्ठा महाराष्ट्र आणि देशात धुळीस मिळवली आहे,” असे संजय राऊत म्हणाले. शिंदेंना कायदा शिकण्याचा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना संजय राऊत यांनी खोचक सल्ला दिला. “तुमच्या नगरविकास मंत्र्यांना सांगा कायदा शिका. गरज पडली तर रात्रशाळेत किंवा प्रौढ साक्षरता वर्गात जा. तुम्हाला आज जी काही साक्षरता मिळाली आहे ती शिवसेनेमुळेच मिळाली आहे, अन्यथा तुम्ही कोण होतात?” असा टोला त्यांनी लगावला. माघारीशी खोके आणि पेट्या संबंध कल्याण-डोंबिवलीतील उमेदवारांच्या माघारीवर भाष्य करताना त्यांनी पैशांच्या देवाणघेवाणीचे आरोप केले. “ज्याप्रमाणे ४० आमदार फुटले, त्याचप्रमाणे हे उमेदवार मागे हटले आहेत. तिथे ५० कोटी होते, तर इथे ५ कोटींची बोली लागली आहे. जळगावला ५० लाख, तर छोट्या पालिकेत कमी दर आहे. हा सर्व ‘खोके’ आणि ‘पेट्यांचा’ खेळ आहे, पण जनता हे खपवून घेणार नाही, निवडणुका होणार,” असे ते म्हणालेत. कायदा-सुव्यवस्थेवरून गृहमंत्र्यांना जाब “भरत गोगावले यांचा सुपूत्र अद्याप फरार कसा. सगळे सापडले पण खूनाचा प्रयत्न करणारा गोगावलेंचा मुलगा मागील दीड महिन्यापासून फरार आहे आणि महाराष्ट्राच्या पोलिसांना सापडत नसतील तर रायगडच्या जिल्हा प्रमुखांना जाब विचारला पाहिजे,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. सोलापुरातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येचा संदर्भ देत ते म्हणाले, “या हत्येचे उत्तर देवेंद्र फडणवीसांना द्यावे लागेल. महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्याच्या गप्पा मारणाऱ्यांनी हा चेहरा रक्ताने माखला आहे. या सरकारमध्ये गुंड आणि खुनी मोहरेच निवडणुकीत उतरवले आहेत.”

Leave a Comment

error: Content is protected !!