मुंबईत महायुतीचाच महापौर होणार:देवेंद्र फडणवीस – एकनाथ शिंदेंत फोनवरून चर्चा; CM दावोसवरून परतल्यानंतर सुटणार BMC चा तिढा

मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजप व शिंदे गटाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. पण महापौर कोणत्या पक्षाचा होणार? या मुद्यावरून दोन्ही पक्षांत जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे फडणवीस दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर मुंबईच्या महापौरपदाचा तिढा सुटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई महापालिकेसाठी गत आठवड्यात निवडणूक झाली. त्यात भाजपला सर्वाधिक 89 जागा मिळाल्या. तर शिंदे गटाला 29, ठाकरे गटाला 65, तर काँग्रेस व मनसेला अनुक्रमे 24 व 6 जागांवर समाधान मानावे लागले. भाजपला आपल्या मदतीशिवाय महापौर बनवणे अशक्य असल्याचे लक्षात येताच शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलात हलवले आहे. त्यानंतर त्यांनी भाजपपुढे अडीच वर्षांच्या महापौरपदाचा प्रस्ताव ठेवून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिंदेंच्या या डावपेचामुळे मुंबीचा महापौर कोण होणार? हा प्रश्न कळीचा बनला आहे. या पार्श्वभूमीवर सूत्रांनी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंशी फोनवरून संवाद साधल्याचा दावा केला आहे. भाजप ठाकरेगटासोबत जाण्याच्या चर्चेत तथ्य नाही यासंबंधीच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. त्यांनी तेथून फोनवरून एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला. या चर्चेत दोन्ही नेत्यांनी दावोस दौऱ्यानंतर एकत्र बसून या मुद्यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. भाजप ठाकरे गटासोबत जाण्याच्या चर्चेत कोणतेही तथ्य नाही. याविषयी अफवांवर विश्वास ठेवण्याची काहीही गरज नाही. मुंबईकरांनी महायुतीवर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाईल असे कृत्य कोणत्याही पक्षाकडून होणार नाही असे दोन्ही नेत्यांनी ठरवल्याची माहिती आहे. या सूचक संवादामुळे फडणवीस परदेश दौऱ्यावरून मुंबईत परतल्यानंतर मुंबईच्या महापौरपदाचा तिढा निकाली निघण्याची शक्यता वाढली आहे. दुसरीकडे, राज्याच्या नगरविकास विभागाने महापौरपदाचे आरक्षण सोडवण्यासाठी गुरुवारी बैठक बोलावली आहे. तोपर्यंत भाजप – शिंदे गटाचा महापौरपदाचा वाद निकाली निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या कुठे आहेत शिंदेंचे मुंबईतील नगरसेवक? शिंदे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवकांचा मुक्काम सध्या मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आहे. निवडणूक निकाल लागला तेव्हाचा या नगरसेवकांना इथे हलवण्यात आले आहे. नवीन नगरसेवकांपैकी कुणीही भाजप किंवा ठाकरे गटाशी संपर्क साधू नये यासाठी खबरदारी म्हणून शिंदे गटाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. विशेषतः भाजपला शिंदे गटाच्या मदतीशिवाय मुंबईत आपला महापौर करता येणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे शिंदेंनी आपल्या नगरसेवकांच्या पाठिंब्याच्या मोबदल्यात भाजपपुढे अडीच वर्षांच्या महापौरपदाचा प्रस्ताव ठेवल्याचीही माहिती आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!