नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात आता नवीन वाद निर्माण झाला आहे. लेखिका अरुणा सबाने यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून महिलांनाही दोषी धरून कारवाई करण्याची मागणी केली आहे. नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणात अशोक खरात नावाचा व्यक्ती स्वतःला ज्योतिषी म्हणवत महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याचा आरोप आहे. गोड बोलून, कधी धमकी देऊन तो महिलांना आपल्या कार्यालयात बोलावत असे. तेथे त्यांना पेढा आणि कडवट चवीचे पेय देऊन त्यांच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. एवढंच नव्हे तर या सर्व घटनांचे चित्रीकरणही केल्याचे तपासात समोर आले आहे. एका महिलेच्या तक्रारीनंतर 17 मार्च रोजी पोलिसांनी खरातला अटक केली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांनी नवा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून, ज्या महिला स्वेच्छेने खरातकडे गेल्या त्यांना ‘पीडित’ न म्हणता दोषी मानून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी पत्रात नमूद केलं आहे की, काही व्हिडिओ पाहिल्यानंतर महिलांना जबरदस्ती किंवा गुंगीचे औषध दिल्याचे स्पष्ट दिसत नाही, तर त्या स्वतःहून सहभागी झाल्यासारख्या वाटतात. त्यामुळे अशा महिलांवरही कायदेशीर कारवाई व्हावी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. सबाने यांनी आणखी एक मागणी करत माजी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही कारवाई करण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, सर्व महिला सुशिक्षित असूनही अशा भोंदू व्यक्तीच्या आहारी कशा जातात, हा मोठा प्रश्न आहे. ज्या महिलांना कुटुंबीयांनी जबरदस्तीने पाठवले असेल त्यांना पीडित मानता येईल, मात्र स्वेच्छेने गेलेल्या महिलांना सूट देऊ नये, असे त्यांनी ठामपणे सांगितले. या पत्रामुळे प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले असून संबंधित महिलांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संगिता तिवारी यांची चाकणकरांविरोधात मागणी इतर संशयितांची चौकशी सुरू या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणाही अधिक सक्रिय झाल्या आहेत. अशोक खरातचा मुलगा सध्या तपास यंत्रणांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. सुरुवातीला तो काही बोलत नव्हता, मात्र नंतर त्याने घरात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम येत असल्याचे सांगितले. या पैशांचे स्रोत आणि व्यवहारांची माहिती वडिलांकडेच होती, असे त्याने कबूल केले आहे. तसेच, या प्रकरणाशी संबंधित डॉक्टर, आर्थिक व्यवहारातील लोक आणि इतर संशयितांची चौकशी सुरू असून पुढील काळात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
