भोंदू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर जितेंद्र शेळके यांच्या अपघाती मृत्यूवरून राज्याच्या राजकारणात वादळ उठले आहे. अनेक नेत्यांनी हा अपघात नसून, घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच भोंदू अशोक खरातच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अत्यंत धक्कादायक आहे. यापूर्वी अनेकांनी अशोक खरातच्या एन्काउंटरची भीती व्यक्त केली आहे. आजच्या अपघाताच्या निमित्ताने ही भीती अधिक ठळक पद्धतीने अधोरेखित होत आहे, असे ते म्हणालेत. जितेंद्र शेळके आज दुपारी 1 च्या सुमारास आपल्या कुटुंबासह छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जात होते. रस्त्यात समृद्धी महामार्गावरील धोत्रे गावालगत त्यांच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या एका कंटेनरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यात जितेंद्र शेळके व त्यांची पत्नी अनुराधा हे दोघे जागीच ठार झाले. तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. ही धडक एवढी भीषण होती की, त्यांची कार थेट कंटेनरखाली घुसली. त्यामुळे तिचा अक्षरशः चुराडा झाला. जखमी मुलाला लगतच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. शेळकेंच्या अपघाती मृत्यूची बातमी अत्यंत धक्कादायक – सुषमा अंधारे सुषमा अंधारे म्हणाल्या, अशोक खरात प्रकरणातील एक महत्त्वाची कडी शिवनिका ट्रस्टचे संचालक जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी ही अत्यंत धक्कादायक आहे. मला ही गोष्ट खरे तर अविश्वसनीय वाटते. कारण, गेल्या अनेक दिवसांपासून ज्या अनेक नेत्यांनी ही भीती किंवा शक्यता व्यक्त केली होती की, अशोक खरातचे एन्काउंटर होऊ शकते. त्याच्या जिवाला धोका उद्भवू शकतो. आजच्या घटनेमुळे ही शक्यता अधिक जास्त ठळक पद्धतीने अधोरेखित होत आहे. कदाचित खरात प्रकरणातील काही सत्यच बाहेर येऊ नयेत असे काही लोकांना वाटत आहे का? असे असले तरीही एसआयटी अजूनही तपासाची गती वाढवत नसेल, या लोकांच्या चौकशा होत नसतील, तर अजून जास्त संशयाचे धूके वाढत आहे. जितेंद्र शेळके हा गुन्हेगारच होता की नव्हता हे कायद्याने ठरवले असते. शिक्षा कायदा देईल. कुणाचा जीव घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. पण जी घटना आज घडली ती मात्र एकूण तपास यंत्रणा आणि एकूण शासन व्यवस्था या सगळ्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे हे मात्र नक्की, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
हा अपघात असूच शकत नाही? – अंजली दमानिया दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही जितेंद्र शेळके यांच्या अपघातावर शंका उपस्थित केली आहे. जितेंद्र शेळके हे शिवनिका संस्थानावर नंबर 2 पोज़िशन वर होते. कल्पना खरात आणि रुपाली चाकणकर ह्याच्यापेक्षा त्यांचे वजन जास्त होते. 3 दिवसापूर्वी त्यांची ED चौकशी झाली आणि आज ते गेले ? हा अपघात असूच शकत नाही, असे दमानिया यांनी म्हटले आहे. भोंदू खरातच्या सुरक्षेची काळजी घ्या – रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही हा अपघात अत्यंत धक्कादायक असल्याचा आरोप केला आहे. शिवनिका संस्थानचे उपाध्यक्ष आणि भोदू अशोक खरात याचे सहकारी जितेंद्र शेळके यांचं अपघाती झालेलं निधन अतिशय धक्कादायक आहे. अजूनही पुढं न आलेले भोंदूचे इतर काही कारनामे पुढं येऊ नयेत आणि यामध्ये कुणीतरी अडचणीत येऊ नये, म्हणून तर हा अपघात घडवून आणला नाही ना, अशी शंका येते. या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. तसंच भोंदू खरातच्या चौकशीतही अनेक बाबी पुढं येणार असल्याने त्याच्याही सुरक्षेची काळजी घ्यावी, असे ते म्हणाले. नेमका शेळकेचाच अपघात कसा? – अमोल मिटकरी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही जितेंद्र शेळके यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला आहे. जितेंद्र शेळके हा भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय होता. दोन दिवसांपूर्वी त्याची ED चौकशी झाल्याचे समजले. आता काही तासांपूर्वी समृद्धी महामार्गावर त्याचा दुर्दैवी अपघाती मृत्य झाला व कुटुंबीय गंभीर जखमी झाले ही घटना दुर्दैवी असून नेमका याच व्यक्तीचा अपघात कसा झाला हे मात्र न सुटणारं कोडं आहे. या प्रकरणी काहीही सत्य समोर येणार नाही, असे ते म्हणालेत.
