Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

अजित पवारांना घड्याळानेच दिली शेवटची ओळख:आजूबाजूला झाडझुडपं, उसाची शेती, वस्ती; विमानातील कागदपत्रे सहिसलामत

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. बुधवारी सकाळी बारामतीत झालेल्या या भीषण दुर्घटनेत अजित पवारांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक यांचा मृत्यू झाला. सर्व मृतदेह अत्यंत जळालेल्या अवस्थेत आढळून आले. अजित पवार यांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या मनगटावरील घड्याळामुळे पटली. राजकीय जीवनात ‘घड्याळ’ हेच चिन्ह घेऊन अजित पवारांचा संपूर्ण प्रवास झाला आणि त्याच घड्याळाने त्यांच्या आयुष्याची शेवटची ओळख पटवणे, हा नियतीचा अत्यंत क्रूर खेळ असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. या अपघाताने संपूर्ण राज्य हादरून गेलं असून राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय वर्तुळात तीव्र शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राने एक अनुभवी, आक्रमक आणि प्रभावी नेता गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बारामतीत अजित पवार यांच्या चार प्रचार सभा नियोजित होत्या. या सभांसाठी ते नेहमीप्रमाणे सकाळी लवकर घराबाहेर पडले. सर्व कामे उरकून सकाळी ठीक ८ वाजून १० मिनिटांनी अजित पवार मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले. नियोजनानुसार लँडिंगनंतर थेट प्रचार दौऱ्याला सुरुवात होणार होती. मात्र, नियतीने वेगळाच घाव घातला आणि हा दौरा कधीही न भरून येणाऱ्या शोकांतिकेत बदलला. सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांच्या सुमारास बारामतीत लँडिंग करत असताना अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. लँडिंगच्या ऐन क्षणी विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी एअरपोर्टपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गोजुबावी परिसरातील शेतात कोसळले. अपघात इतका जबरदस्त होता की विमानाचे तुकडे झाले आणि काही क्षणांतच विमानाला भीषण आग लागली. अपघात ज्या ठिकाणी झाला तो भाग खोलगट असून आजूबाजूला झाडझुडपं, उसाची शेती आणि काही घरांची वस्ती आहे. विमान थेट उतारावरील जमिनीवर आदळल्यामुळे त्याला प्रचंड धक्का बसला. संपूर्ण विमान जळून कोळसा झाले. मात्र या भीषणतेतही आश्चर्याची बाब म्हणजे विमानातील काही कागदपत्रे सहिसलामत आढळून आली. अंदाज व्यक्त केला जात आहे की, विमान कोसळल्यानंतर दोन तुकड्यांमध्ये विभागले गेले असावेत आणि त्यामुळे कागदपत्रे बाहेर फेकली गेली असावीत. या अपघाताचा घटनाक्रम पाहता, सकाळी ८.१० वाजता लियरजेट 45 XR प्रकारचे विमान मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी ८.४० च्या सुमारास विमान बारामती एअरस्ट्रीपच्या अगदी जवळ आले असताना त्यात तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अवघ्या सहा मिनिटांत, म्हणजेच सकाळी ८.४६ वाजता, वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि विमान थेट शेतात कोसळले. या अपघातात विमानातील एकाही व्यक्तीचा जीव वाचू शकला नाही. या अपघातानंतर अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. बारामतीपासून मुंबईपर्यंत, गावोगाव शोक व्यक्त केला जात आहे. निवडणूक प्रचारासाठी निघालेले अजित पवार परत येणार नाहीत, ही कल्पनाच कार्यकर्त्यांना आणि जनतेला पचवणं कठीण होत आहे. धडाडीचा, कडक शिस्तीचा आणि निर्णयक्षम नेता अचानक काळाच्या पडद्याआड गेला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!