Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलात ‘कैद’ केल्याने नाराज?:विजयाचे प्रमाणपत्र ताब्यात घेतल्याने अस्वस्थ, गट स्थापन करण्याचा प्रयत्न लांबणीवर

मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्याच्या मुद्यावरून सत्ताधारी भाजप व शिंदे गटातील तिढा अद्याप सुटला नाही. त्यातच शिंदे गटाने आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचे विजयाचे प्रमाणपत्र आपल्या ताब्यात घेतले आहे. यामु्ळे नाराज झालेल्या नगरसेवकांचे पाय हळूहळू वांद्रे स्थित पंचतारांकित हॉटेलमधून आपल्या मतदारसंघाच्या दिशेने वळत आहेत. मुंबई महापालिकेसाठी गत 15 जानेवारी निवडणूक झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल घोषित झाले. त्यात भाजपला सर्वाधिक 89 जागा मिळाल्या, तर शिंदे गटाला अवघ्या 29 जागांवर समाधान मानावे लागले. भाजपला आपल्याशिवाय महापौर बसवणे कठीण असल्याचे लक्षात येताच एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व नगरसेवकांना मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले. त्यानंतर त्यांनी भाजपपुढे अडीच वर्षांच्या महापौरपदाचा प्रस्ताव ठेवला. भाजपने अद्याप शिंदेंच्या या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला नाही. उलट मुंबईत आपलाच महापौर होणार असल्याचे ठणकावून सांगितले आहे. या घटनाक्रमामुळे मुंबईतील सत्ता स्थापनेचा तिढा अजून काही दिवस लांबण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने फोडाफोडीच्या भीतीने आपल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे विजयाचे प्रमाणपत्र आपल्या ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सत्ताधारी शिवसेनेने आपल्या सर्वच नगरसेवकांचे आधार कार्ड व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेले विजयाचे प्रमाणपत्र आपल्या ताब्यात घेतले आहे. नगरसेवक निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. यामुळे त्यांना त्यांच्या समर्थकांसोबत आपल्या विजयाचा आनंदही साजरा करता आला नाही. तसेच आपल्या मतदारांची भेटही घेता आली नाही. यामुळे त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे. शिंदे गटाचा गट स्थापन करण्याचा प्रयत्न लांबणीवर विशेष म्हणजे शिवसेनेने आपल्या नगरसेवकांचा गट स्थापन करण्यास प्राधान्य देत हॉटेलमध्ये एकजूट राहण्याचे निर्देश दिले होते. महानगरपालिका कायद्यानुसार, नगरसेवक गट स्थापन करण्यापूर्वी पक्षांतर करू शकतात. पण गट स्थापन झाल्यानंतर पक्षांतर करण्यावर बंदी येते. त्यानंतर एखाद्या प्रसंगात एक तृतीयांश नगरसेवकांनी पक्षांतर केले तरच पक्षाचे विभाजन शक्य होते. या भीतीमुळे शिंदे गटाने गट स्थापन करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या इराद्याने आपल्या नगरसेवकांना तत्काळ सुरक्षित स्थळी हलवले होते. तथापि, आता शिंदे गटाने गटबांधणीची प्रक्रिया तूर्त लांबणीवर टाकली आहे. शिवसेना सरचिटणीस व माजी खासदार राहुल शेवाळे दिल्लीला जाणार आहेत. ते तिथे विविध महापालिकांमधील युती व महापौरपदाच्या मुद्यावर भाजपच्या नेतृत्वाशी चर्चा करणार आहेत. यामुळे शिंदे गटाने गट स्थापन करण्याची प्रक्रिया तूर्त काही दिवस लांबणीवर टाकली आहे. त्यातच पक्षाने विजयाचे प्रमाणपत्र व आधार कार्ड घेतल्यामुळे नगरसेवक आता हॉटेल सोडून आपल्या घराच्या दिशेने निघालेत. शिंदे गटात असंतोष वाढण्याची भीती उल्लेखनीय बाब म्हणजे 227 सदस्यीय मुंबई महापालिकेत 114 हा बहुमताचा जादुई आकडा आहे. निवडणुकीत भाजपचे 89 व शिंदे गटाचे 29 उमेदवार निवडून आलेत. यामुळे या दोन्ही पक्षांच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. पण सत्तावाटपाच्या तिढ्यामुळे अद्याप महापौरपदाचा मुद्दा निकाली निघाला नाही. दरम्यान, शिवसेनेने आपल्या नगरसेवकांचे मूळ दस्तऐवज आपल्या ताब्यात घेतल्यामुळे पक्षांतराची शक्यता टळली आहे. पण यामुळे पक्षांतर्गत असंतोष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मुंबईत अनेक वेगवान घटना घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!