अजित पवारांची शरद पवारांसोबत जाण्याची मानसिकता होती:एकत्रीकरणास अडचण येऊ नये म्हणून घड्याळावर निवडणूक; पक्षाचे 10 तारखेला ठरणार होते– शशिकांत शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसची खरी ओळख ही पवार कुटुंब आहे. अजित पवारांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो काही त्याग करावा लागेल तो करण्यास आम्ही पूर्णपणे तयार आहोत. पवार कुटुंबाने एकत्र येऊन निर्णय घ्यावा, आम्ही सर्वजण त्यांच्या निर्णयाच्या पाठीशी उभे राहू, अशी स्पष्ट भूमिका शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मांडली आहे. पवार कुटुंबाला मानणारा मोठा जनाधार एकत्र आला असता तर 2029 मध्ये अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकले असते, मात्र ते स्वप्न अपूर्णच राहिले, असेही ते म्हणाले. शशिकांत शिंदे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी प्रमुख नेत्यांच्या पाच ते सात बैठका झाल्या होत्या. या बैठकींमध्ये पक्षाच्या एकत्रीकरणाबाबत कोणते मुद्दे चर्चेला घ्यायचे, यावर सविस्तर चर्चा झाली होती. मात्र त्याचदरम्यान निवडणूक जाहीर झाल्याने प्रक्रिया पुढे नेता आली नाही. म्हणून घड्याळ चिन्हावर निवडणूक शशिकांत शिंदे म्हणाले की, आठ ते दहा दिवसांपूर्वी अजित पवार आणि आम्ही जयंत पाटील यांच्या बंगल्यावर एकत्र बसलो होतो. एकत्रीकरणात कुठेही अडथळा येऊ नये, मतांचे विभाजन होऊ नये, यासाठीच घड्याळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांनंतर 9 ते 10 तारखेपर्यंत अंतिम निर्णय म्हणजेच ‘सोक्षमोक्ष’ लावायचा, असेही ठरले होते. मात्र दुर्दैवाने तो निर्णय होऊ शकला नाही आणि एकत्रीकरणाचे स्वप्न स्वप्नच राहिले. पक्ष मजबूत होणे महत्त्वाचे शशिकांत शिंदे म्हणाले की, पवार कुटुंबाने एकत्र येऊन नेतृत्वाचा निर्णय घ्यावा, अशी स्पष्ट मागणी करत शशिकांत शिंदे म्हणाले की, कोणाला नेतृत्व दिले जाते यापेक्षा पक्ष मजबूत होणे महत्त्वाचे आहे. नाव कुणाचेही पुढे आले तरी आम्ही त्या नेतृत्वाला पाठिंबा देऊ. राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम करण्याचा विचार करत पुढे जावे लागेल, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, दादांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. त्यांच्याकडे प्रशासनावर पकड होती, निर्णयक्षमता होती. त्यांना संधी मिळाली असती तर राज्यात वेगळे चित्र दिसले असते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याचा विचार त्यांच्या मनात आणि नजरेसमोर कायम होता, कारण मतांचे विभाजन होऊ नये, हीच त्यांची भूमिका होती. दादांची एकत्र येण्याची मानसिकता अजित पवार यांच्या भावनिक बाजूचा उल्लेख करत शशिकांत शिंदे म्हणाले की, एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय झाल्यानंतर अजित पवार अनेकदा मला फोन करत असत. कुठे काय सूचना आहेत, प्रचार सभा एकत्र कशा घ्यायच्या, याबाबत ते सतत विचारायचे. शरद पवार यांना पाहिल्यानंतर अजित पवार अधिक भावनिक होत असत. शरद पवारांसोबतचे नेतृत्व आपल्यासोबत यावे, त्यासाठी कितीही त्याग करायला तयार आहे आणि आता शरद पवारांसोबतच आपण जायला पाहिजे, ही त्यांची मानसिकता होती, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

error: Content is protected !!