अजित पवार विमान अपघातप्रकरणी मोठा ट्विस्ट:व्हीएसआर व्हेंचर्स कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आधीच ब्लॅकलिस्ट, युरोपने घातली बंदी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरलेला असतानाच, या प्रकरणातील विमान कंपनी ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ (VSR Ventures) बाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. युरोपियन हवाई नियामक संस्था EASA (European Union Aviation Safety Agency) ने या कंपनीची ‘थर्ड कंट्री ऑपरेटर’ (TCO) अधिकृतता एक वर्षापूर्वीच निलंबित केली होती. सुरक्षेच्या अत्यंत गंभीर त्रुटी आणि तपासात असहकार्य केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती, तरीही ही कंपनी भारतात सेवा कशी देत होती, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. युरोपियन हवाई नियामक संस्थेच्या अहवालानुसार, व्हीएसआर व्हेंचर्सला ‘लेव्हल १’ या सर्वात गंभीर श्रेणीतील सुरक्षा त्रुटींमध्ये ठेवण्यात आले होते. ‘लेव्हल १’ म्हणजे अशी परिस्थिती जिथे प्रवाशांच्या सुरक्षेचा कोणताही ठोस पुरावा नसतो किंवा संबंधित कंपनी नियामक संस्थांना सहकार्य करण्यास नकार देते. युरोपियन हवाई क्षेत्रात उड्डाण करण्यासाठी किंवा तिथे उतरण्यासाठी ही अधिकृतता अनिवार्य असते, जी या कंपनीकडे नव्हती. २०२३ च्या अपघाताचा डेटा लपवला सप्टेंबर २०२३ मध्ये मुंबईत या कंपनीच्या एका ‘लिअरजेट ४५’ विमानाला अपघात झाला होता. या अपघातासंदर्भात EASA ने कंपनीकडे वारंवार कागदपत्रे आणि तांत्रिक माहिती मागितली होती. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२४ मध्ये पाच वेळा स्मरणपत्रे पाठवूनही कंपनीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. कंपनीने अंतर्गत चौकशीचे अहवाल दिले नाहीत. याशिवाय सुरक्षेच्या उपाययोजनांची माहिती देण्यास नकार दिला. तसेच वारंवार पाठवलेल्या नोटिसींकडे दुर्लक्ष केले. या असहकार्यामुळेच EASA ने या कंपनीवर बंदी घालून आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याचा शिक्का मोर्तब केला होता. DGCA कडेही होती माहिती? विशेष म्हणजे, युरोपियन युनियनने या बंदीच्या आदेशाची प्रत भारताच्या नागरी विमान वाहतूक संचालनालयाला (DGCA) देखील पाठवली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘धोकादायक’ ठरवण्यात आलेली ही कंपनी महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी कशी वापरली गेली, हा आता तपासाचा मुख्य विषय ठरला आहे. काय आहे ‘व्हीएसआर व्हेंचर्स’चा इतिहास? गेल्या आठवड्यात बारामती जवळ कोसळलेले लिअरजेट विमान देखील याच कंपनीच्या मालकीचे होते, ज्यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. या कंपनीकडे आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्रे आणि आंतरराष्ट्रीय निकषांची पूर्तता नव्हती, हे आता स्पष्ट होत आहे. बारामती विमान अपघाताचा तपास सीआयडीकडे दरम्यान, महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवला आहे. केंद्राच्या AAIB विभागाने ब्लॅक बॉक्स जप्त केला आहे. यातील माहितीवरून अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल. कंपनीच्या मालकांवर कडक कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!