बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या विलास घुले यांच्या हत्येचे तीव्र पडसाद आज थेट विधानसभेत उमटले. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले असून, आरोप-प्रत्यारोप, चौकशीची मागणी आणि कठोर कारवाईच्या सूचना यामुळे सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या प्रकरणावर परळीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सभागृहात जोरदार भूमिका घेत या हत्येमागील मास्टरमाईंडचा पोलिसांकडून बचाव सुरू आहे, असा गंभीर आरोप केला. तर मंत्री पंकजा मुंडे यांनीही या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत सखोल तपासाची मागणी केली आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेत गृह विभागाला योग्य चौकशीचे निर्देश दिले आहेत. केजमध्ये नेमकं काय घडलं? — भांडणातून थेट खूनापर्यंतचा थरार बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात 20 जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कदमवाडी फाट्यावरील ‘हॉटेल गावकरी’ येथे ही धक्कादायक घटना घडली. हॉटेल चालक विलास घुले हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत हॉटेलमध्ये बसले असताना, पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून काही जण तेथे आले. अनैतिक संबंधाच्या संशयावरून झालेल्या वादातून अचानक मारहाण सुरू झाली. या वेळी उमेश माने याला बेदम मारहाण करण्यात आली. तो जीव वाचवण्यासाठी पळाला. त्याला वाचवण्यासाठी विलास घुले आणि नितीन घुले धावले. त्याच वेळी हल्लेखोरांनी विलास घुले यांच्यावर चाकूने वार केला. गंभीर जखमी झालेल्या विलास घुले यांना आधी केज आणि नंतर अंबाजोगाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 9 आरोपींवर गुन्हा; 3 जण ताब्यात, उर्वरित फरार या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर केज आणि परिसरात तणाव निर्माण झाला आहे. संतप्त नातेवाईकांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. केज–बीड महामार्गावर रास्ता रोको केला आणि आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. “पूर्वनियोजित कटाचा शोध घ्या” — धनंजय मुंडेंची आक्रमक मागणी सभागृहात बोलताना धनंजय मुंडे यांनी हे प्रकरण केवळ भांडण नसून “पूर्वनियोजित कट” असल्याचा आरोप केला. त्यांनी म्हटले की, या प्रकरणातील मास्टरमाईंडचा पोलिसांकडून बचाव सुरू आहे, तपासात पारदर्शकता असावी. सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी. संपूर्ण पाळेमुळे खोदून तपास करावा.” मुंडे यांनी हा मुद्दा “पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन”च्या माध्यमातून उपस्थित करत सरकारला कठोर भूमिका घेण्याची मागणी केली. पंकजा मुंडेंची भूमिका — “घटना अत्यंत दुर्दैवी” या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, ही घटना अत्यंत दुर्दैवी असून निष्पाप तरुणाचा मृत्यू मनाला अस्वस्थ करणारा आहे. त्यांनी सांगितले की, पोलिस अधीक्षकांशी सविस्तर चर्चा झाली आहे. कोणत्याही दबावाशिवाय तपास व्हावा. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. कुटुंबीयांनी प्रशासनावर विश्वास ठेवावा. मी याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या भूमिकेमुळे सभागृहात या मुद्द्याचे गांभीर्य अधिक वाढले. विधानसभा अध्यक्षांचे निर्देश राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची दखल घेत तातडीने गृह विभागाला निर्देश दिले. त्यांनी स्पष्ट केले की, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. सर्व बाजूंनी वस्तुनिष्ठ तपास होणे आवश्यक आहे. मुख्य सूत्रधाराचा शोध घेणे गरजेचे आहे. कोणालाही पाठीशी घालू नये, या निर्देशांमुळे प्रशासनावर तपास जलद करण्याचा दबाव वाढला आहे. केजमध्ये तणावपूर्ण वातावरण घटनेनंतर केज परिसरात मोठा जनआक्रोश पाहायला मिळत आहे. नागरिक आणि नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासही तयार नाहीत, जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त फौजफाटा तैनात केला आहे. मुख्य रस्त्यांवर बंदोबस्त वाढवला आहे, संवेदनशील भागात गस्त सुरू केली आहे. बीडच्या केजमधील हे हत्याकांड आता केवळ स्थानिक प्रकरण राहिलेले नाही, तर थेट विधानसभेपर्यंत पोहोचले आहे. मुंडे बंधु-भगिनींच्या भूमिकेमुळे आणि विरोधकांच्या दबावामुळे सरकारवर तपास लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी वाढली आहे. आता सर्वांचे लक्ष पोलिस तपास आणि पुढील घडामोडींवर केंद्रित झाले आहे. संबंधित बातमी वाचा… विधिमंडळाच्या कामकाजाशी संबंधित बातमी वाचा… बीडमध्ये खळबळ!:भांडणात मध्यस्थी करायला गेलेल्या हॉटेल चालकाची चाकूने भोसकून हत्या, केजमध्ये तणावाचे वातावरण बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात दोन गटांतील भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या विलास घुले या हॉटेल चालकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून, अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचारादरम्यान काल दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. या भीषण घटनेमुळे केज परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी संतप्त नातेवाइकांनी थेट पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन वेळा रस्ता रोको आंदोलन केल्यामुळे परिसरातील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती. येथे वाचा संपूर्ण बातमी पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस:ड्रग्जची माहिती द्या, नाव गुप्त ठेवून बक्षीस मिळवा; अमली पदार्थ तस्करांचे कंबरडे मोडण्यासाठी फडणवीसांची घोषणा महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, दुष्काळ, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. दुसरीकडे, विविध प्रलंबित मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत असताना महायुती सरकारकडून महत्त्वाची विधेयके मांडली जाणार असल्याने आजचे कामकाज वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी
