Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

चंद्रपुरात भाजप-ठाकरे सेना एकत्र; हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया:अंतर्गत गटबाजीचा काँग्रेसला फटका बसल्याचे केले मान्य

चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर निवडणुकीने राज्याच्या राजकारणात नवे समीकरण उभे केले आहे. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र आले. ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा देत महापौरपदासाठी साथ दिली. या निर्णयामुळे चंद्रपूरमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले. या करारानुसार भाजपला महापौरपद मिळणार तर ठाकरेंच्या शिवसेनेला स्थायी समितीवर नियंत्रण मिळणार असल्याचे ठरले. या पार्श्वभूमीवर भाजपच्या संगीता खांडेकर या महापौरपदी विराजमान झाल्या. त्यांनी काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांचा अतिशय चुरशीच्या लढतीत पराभव केला. खांडेकर यांना 32 मते मिळाली, तर महाडोळे यांना 31 मते मिळाली. अवघ्या एका मताच्या फरकाने झालेला हा निकाल महापालिकेतील राजकीय संतुलन किती नाजूक आहे, हे दाखवणारा ठरला. ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा निर्णायक ठरल्याची चर्चा सुरू झाली. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी या निर्णयामागचे कारण स्पष्ट केले. काँग्रेसनेही स्थायी समिती देऊ केली होती; मात्र पुढील पाच वर्षांत महापौरपद मिळण्याची शक्यता नसल्याने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. सत्तेत थेट सहभाग आणि प्रभावी भूमिका मिळावी, या विचारातून हा निर्णय झाल्याचे त्यांनी नमूद केले. काँग्रेसला अंतर्गत गटबाजीचा फटका – सपकाळ या घडामोडींवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. चंद्रपूरमध्ये ठाकरे सेनेचा भाजपला पाठिंबा ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करणारी ठरेल, असे ते म्हणाले. ठाकरे सेनेसोबत वंचितचे दोन नगरसेवकही भाजपसोबत जाणार असल्याची प्राथमिक माहिती त्यांनी दिली. अंतर्गत गटबाजीचा फटका काँग्रेसला बसत असल्याचेही त्यांनी मान्य केले. चंद्रपूरमधील या राजकीय बदलाचा परिणाम आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांवर होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. विशेषतः राज्यसभेच्या निवडणुकीत मविआच्या संख्याबळातून जाणाऱ्या खासदाराच्या गणितावर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच उद्धव ठाकरे पुन्हा विधानपरिषदेवर जाणार असल्यास त्यांना मित्रपक्षांच्या पाठिंब्याची गरज भासू शकते. राज्याच्या राजकारणातही चर्चा महानगरपालिकेतील एकूण 66 जागांचे चित्रही या समीकरणाला अधिक स्पष्ट करते. काँग्रेसकडे 27 जागा आहेत, तर काँग्रेसशी निवडणूकपूर्व आघाडी असलेल्या जनविकास सेनेकडे 3 जागा आहेत. भाजपकडे 23, शिंदे सेनेकडे 1, उबाठा शिवसेनेकडे 6, वंचितकडे 2, बसपाकडे 1, काँग्रेस बंडखोर अपक्ष 2 आणि एमआयएमकडे 1 जागा आहे. या सर्व संख्याबळात झालेल्या बदलामुळे सत्तेचे गणित नव्याने मांडावे लागले. एकूणच, चंद्रपूरमधील महापौर निवडणुकीने केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर राज्याच्या राजकारणातही चर्चा निर्माण केली आहे. स्थायी समितीच्या बदल्यात दिलेला पाठिंबा, एका मताने झालेला विजय, आणि त्यावर उमटलेली राजकीय प्रतिक्रिया यामुळे चंद्रपूरचा हा प्रयोग पुढील राजकीय घडामोडींमध्ये दिशादर्शक ठरू शकतो.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!