वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत सरसंघ चालक मोहन भागवत तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात अभिनेता सलमान खान उपस्थित होता. यावरून देखील आंबेडकरांनी संघावर टीकेची झोड उठवली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, मोहन भागवत यांनी मुंबईत बॉलीवूडमधील लोकांसमोर भाषण दिले. आरएसएसने एकेकाळी ह्या सर्व सांस्कृतिक कलेचा निषेध केला होता, शिव्या दिल्या होत्या. नटांना नाच्या म्हणून त्यांनी संबोधले होते. सिनेमातील जे सेलिब्रिटी आहेत, त्यांना त्यांच्या कामामुळे समाजात मान्यता आहे, त्याचा फायदा घेण्यासाठी आरएसएसने हे काम सुरू केले आहे. हे आरएसएसचे नवीन चारित्र्य असल्याची टीका आंबेडकरांनी केली आहे. तसेच आरएसएसचे गोळवलकर यांनी बंच ऑफ थॉट्स या पुस्तकात आरएसएससाठी सांस्कृतिक रोड मॅप दिला होता, त्याचा मोहन भागवत निषेध करतायत का? याचा खुलासा त्यांनी करावा, असेही आंबेडकर म्हणाले. जेलमध्ये जाण्याच्या आधी सावरकर क्रांतिवीर होते विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी सध्या सुरू आहे. यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, दुर्दैवाने मोहन भागवत यांनी सावरकर यांच्यावरचा माझा लेख त्यांनी वाचला नसेल. सावरकरांचे दोन चेहरे आहेत. एक क्रांतिकारी सावरकर आणि एक ब्रिटीशांना मदत करणारे सावरकर. जेलमध्ये जाण्याच्या आधी ते क्रांतिवीर होते, हे सर्वांनीच मान्य केले पाहिजे. पण जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांची संघटना जी होती हिंदू महासभा, या संघटनेने पत्री सरकारच्या लढवय्याना ब्रिटीशांना पकडून देण्याचे काम केले आहे. सावरकरांनी ब्रिटिशांना मदत केली, त्यांना भारतरत्न देऊ नये प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांविरोधात पत्री सरकार लढत होते, तेव्हा त्या लढवय्यांना ब्रिटिशांना पकडून देण्याचे काम हिंदू महासभा करत होती. सातारा, सांगली, कोल्हापूरमधील पत्री सरकारमधील अनेकांना त्यांनी पकडून दिले होते. तेव्हा हिंदू महासभेच्या एका व्यक्तीने सांगितले होते की, हे काम आम्ही आमच्या प्रमुखाच्या म्हणजेच विनायक सावरकर यांच्या सांगण्यावरून करतोय. सावरकरांनी ब्रिटिशांना मदत केली होती. त्यामुळे अशा व्यक्तीला भारतरत्न द्यावा, असे मी मानत नाही, असे मत आंबेडकरांनी व्यक्त केले आहे.