मावळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा डंका!:विजयानंतर सुनील शेळकेंचे डोळे पाणावले, म्हणाले- दादा असते तर विजयोत्सव साजरा केला असता

मावळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 2026 च्या निवडणुकीत आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व 5 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समिती जागांवर घवघवीत यश मिळवले आहे. या विजयानंतर कौतुक करायला अजित पवार हयात नसल्याने सुनील शेळके भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. सुनील शेळके म्हणाले, अजितदादा असते तर आम्ही आज विजयोत्सव साजरा केलया असता. या कठीण परिस्थितीमध्येही मावळच्या मायबाप जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली. अजित पवार यांनी मावळच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी दिला, त्या कामांनाही सुरुवात झाली. आजचा निकाल म्हणजे अजित पवार जनतेने अजित पवार यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करणे आहे, असे शेळके यांनी म्हटले. तसेच अजित पवारांच्या आठवणीत शेळके यांचे डोळे पाणावले व त्यांनी पुढे बोलणे टाळले. आटपाडी तालुक्यातील करगणी जिल्हा परिषद गटातून अजित पवार राष्ट्रवादीचे विनायक मासाळ विजयी झाले आहेत. अजित पवार यांनी स्वतः विनायक मासाळ यांची उमेदवारी जाहीर केली होती. तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा द्यायला सांगितले होते. जिल्हा परिषदेचे उमेदवारी जाहीर केली, मात्र आज माझा विजय बघायला ते हयात नाहीत याचे मोठे दुःख असल्याची भावना मासाळ यांनी व्यक्त केली. दरम्यान, राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या 12 जिल्ह्यांतील जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. त्यात भाजपने सर्वाधिक 7 जिल्हा परिषदा आपल्या खिशात घातल्या आहेत. तर सत्ताधारी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 2 जिल्हा परिषदा मिळाल्या आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!