महाराष्ट्रानंतर रोहित पवार यांची दिल्लीतही पत्रकार परिषद:म्हणाले- तपास यंत्रणांचा तपास धिम्या गतीने; गती हवी; शहांची वेळ मागितली

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या बारामतीतील विमान दुर्घटनेबाबत पुन्हा एकदा ठोस भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रातील पत्रकार परिषदेत त्यांनी मांडलेले सर्व प्रश्न त्यांनी पुन्हा एकदा दिल्लीत पत्रकार परिषदेत मांडले. हे सर्व प्रश्न केवळ भावनिक किंवा वरवरचे नसून प्रत्येक मुद्द्यामागे आधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सादरीकरणातून माध्यमांना संपूर्ण माहिती पाहता किंवा डाउनलोड करता येईल, असेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्राने एक नेता गमावला आहे आणि कुटुंबाने आपला सदस्य गमावला आहे, त्यामुळे सर्व शंका निरसन होईपर्यंत हा मुद्दा पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच हे सर्व प्रश्न मांडण्यासाठी अमित शहा यांची भेटीसाठी वेळ मागितली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. रोहित पवार यांनी म्हटले की, या अपघाताबाबत अनेक प्रश्न आम्ही उपस्थित केले. हे प्रश्न हवेतले नाहीत. प्रत्येक मुद्दा आणि त्यामागचा आधार सादरीकरणात आहे. माध्यम प्रतिनिधींनी तो पाहावा. या दुर्घटनेत मी माझ्या काकांना गमावले आहे आणि महाराष्ट्राने आपला नेता गमावला आहे. त्यामुळे आमच्या सर्व शंका दूर होणे आवश्यक आहे. तोपर्यंत आम्ही हा विषय सोडणार नाही. राज्य आणि केंद्र सरकार तसेच तपास यंत्रणांकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. याआधीही रोहित पवार यांनी या दुर्घटनेच्या परिस्थितीवर प्रश्न उपस्थित करत, हा केवळ अपघात होता की त्यामागे काही कटकारस्थान आहे का, अशी शंका व्यक्त केली होती. बारामतीतील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले होते की, अजूनही अनेकांना दादा परत येतील अशी भावना आहे. काही जण विमानात सहा जण होते, सापडलेले पार्थिव अजित पवारांचे नव्हते, अशा चर्चा करत आहेत. मला अजूनही हे एक वाईट स्वप्न वाटते, असे ते म्हणाले होते. या वातावरणामुळे राज्यात संशय, दु:ख आणि राजकीय चर्चांचा ताण निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. रोहित पवार यांनी तपासाच्या संदर्भात एक पुस्तकही उल्लेखले, ज्यात एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करण्यासाठी त्याच्या चालकावर हल्ला करणे सोपे असते, असा उल्लेख आहे, असे त्यांनी सांगितले. या उदाहरणाचा संदर्भ देत त्यांनी या दुर्घटनेभोवती निर्माण झालेल्या संशयाकडे लक्ष वेधले. त्यांच्या मते, सर्व बाजूंनी निष्पक्ष आणि सखोल तपास झाला पाहिजे, जेणेकरून सत्य स्पष्ट होईल. यासाठी केंद्र सरकार आणि संबंधित तपास यंत्रणांनी सहकार्य करावे, अशी त्यांची मागणी आहे. 28 जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या चार्टर विमानाचा बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांच्या वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्याचा, वैमानिक, सहवैमानिक आणि विमान परिचारिकेचा मृत्यू झाला. नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या (DGCA) माहितीनुसार, हे विमान लिअरजेट 45 प्रकारचे होते आणि धावपट्टीच्या टोकाशी क्रॅश-लँडिंग झाल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेने राज्यभरात शोककळा पसरली. 7 फेब्रुवारीपर्यंत एअरक्राफ्ट अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) आणि DGCA यांनी या अपघाताच्या तपासात वेगाने प्रगती केल्याची माहिती समोर आली. तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास, विमानाचे अवशेष, हवामान, उड्डाणाची नोंद आणि इतर घटकांचा तपास सुरू असल्याचे सांगितले गेले. या तपासातून नेमकी कारणमीमांसा स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रोहित पवार यांनीही या तपासातून सर्व प्रश्नांची उत्तरे मिळावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. शंका निरसन होईपर्यंत हा विषय पुढे नेण्याचा निर्धार एकीकडे तपास यंत्रणा आपले काम करत असताना, दुसरीकडे रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे या दुर्घटनेभोवतीची चर्चा अधिकच वाढली आहे. त्यांनी सादरीकरणाद्वारे मांडलेले मुद्दे सार्वजनिक केल्याने माध्यमे आणि नागरिकांना त्यांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली आहे. सत्य बाहेर यावे आणि सर्व शंका दूर व्हाव्यात, हीच भूमिका त्यांनी ठामपणे मांडली आहे. शंका निरसन होईपर्यंत हा विषय पुढे नेण्याचा त्यांचा निर्धार कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत VSR चे विमान वापरू नये रोहित पवार यांनी दिल्लीमध्ये बोलताना VSR कंपनीच्या विमानांच्या देखभालीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री, मंत्री, काही नेते तसेच काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकर यांनीही VSR विमानाचा वापर केला होता. मात्र VSR कडून विमानांची योग्य देखभाल होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. 2023 मधील मुंबईतील अपघात आणि अजित पवार यांच्या विमान अपघातामागे हीच निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीतही VSR चे विमान वापरू नये, अशी त्यांनी विनंती केली. युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी (EASA) ने 2023 च्या अपघाताबाबत माहिती न मिळाल्याने VSR चा परवाना रद्द केल्याचे त्यांनी सांगितले. DGCA मार्फत अहवाल युरोपियन संस्थेला जाणार होता, मात्र एका राजकीय व्यक्तीने तो मुद्दाम रोखल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. शरीरातील सूज प्रमाणापेक्षा अधिक दिल्लीतील प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. अपघातानंतर डॉक्टरांशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या पार्थिव देहात असामान्य सूज दिसून आली होती. आगीत मृत्यू झाल्यानंतर शरीरात सूज येऊ शकते, असे डॉक्टरांनी मान्य केले, मात्र दिसलेली सूज प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले, अशी माहिती रोहित पवारांनी दिली. या वक्तव्यामुळे अपघाताबाबत पुन्हा चर्चांना वेग आला असून अनेक शंका उपस्थित होत आहेत. घटनाक्रमाबाबत अधिक स्पष्टता यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रोहित पवार यांच्या याच मागणीवरील खालील बातमी देखील वाचा…. अजितदादांचा घातपात झाला:रोहित पवार यांचा आरोप; VSR विमान कंपनीसह कपूर नावाच्या पायलटवरही संशय व्यक्त

Leave a Comment

error: Content is protected !!