बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला लावलेल्या उपस्थितीवरून सुरू असलेल्या चर्चेवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. “सलमान खान हा भारताचा नागरिक आहे. त्यामुळे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला गेला, तर त्यात चुकीचे काय आहे?” असा थेट सवाल उपस्थित करत शिंदे यांनी संघाच्या कार्याचे कौतुक केले आहे. २०२५-२६ हे वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम, व्याख्यानमाला आणि शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत नुकतीच सरसंघचालक मोहन भागवत यांची व्याख्यानमाला पार पडली. मोहन भागवतांच्या या व्याख्यानमालेत अभिनेता सलमान खानसह अनेक बॉलिवूडमधील मंडळींनी हजेरी लावली होती. तर संघाच्या या कार्यक्रमाला सर्व मंडळी प्रेमाखातर नाही, तर नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती, अशी टीका विरोधकांनी केली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. नेमके काय म्हणाले एकनाथ शिंदे? प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचा आणि त्यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले, “आरएसएस या संस्थेला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. गेली अनेक दशके आपण या संस्थेकडे एक देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना म्हणून पाहत आलो आहोत. कट्टर देशभक्ती आणि राष्ट्रप्रेम काय असते, हे जगाने संघाच्या माध्यमातून अनुभवले आहे.” संघाच्या सामाजिक कार्यावर भाष्य करताना शिंदे पुढे म्हणाले की, “जेव्हा जेव्हा देशावर संकट येते, मग ती नैसर्गिक आपत्ती असो किंवा इतर कोणतीही आपदा, तेव्हा संघाचे स्वयंसेवक स्वत:हून पुढे येतात आणि मदतकार्य करतात. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली संघ सातत्याने राष्ट्रभक्तीचा विचार रुजवण्याचे काम करत आहे. अशा राष्ट्रप्रेमी संघटनेच्या कार्यक्रमाला सलमान गेला असेल, तर त्यात गैर काय?” अशी विचारणाही एकनाथ शिंदे यांनी केली. या विषयावर राजकारण करायला नको सलमान खानच्या उपस्थितीचे समर्थन करताना शिंदे यांनी त्याच्या कौटुंबिक संस्कृतीचाही दाखला दिला. ते म्हणाले, “सलमान खान आणि त्याचे संपूर्ण कुटुंब भारतीय संस्कृती मानणारे आहे. त्यांच्या घरी दरवर्षी गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. तो एक मुंबईकर आहे आणि भारताचा नागरिक आहे. संघाचा कार्यक्रम मुंबईत असल्याने तो तिथे गेला. त्यामुळे या विषयावर नाहक राजकारण करणे चुकीचे आहे.