भगतसिंह असते तर चोपला असता:कोश्यारींच्या वक्तव्यावर संदीप देशपांडे आक्रमक; कॅरेक्टर ढिला म्हणत, ठाकरेंच्या सेनेवरही टीका

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाशिकमधील कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. राज ठाकरे नरेंद्र मोदी यांना जास्त घाबरतात, असा दावा कोश्यारींनी केला होता. या विधानानंतर मनसेकडून प्रतिक्रिया येणे अपेक्षित होते. अखेर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना कोश्यारींच्या वक्तव्याचा कठोर शब्दांत समाचार घेतला. त्यांच्या प्रतिक्रियेत रोष स्पष्ट दिसून आला. कोश्यारींनी केलेल्या टीकेला मनसे शैलीत उत्तर देत देशपांडेंनी आक्रमक भूमिका मांडली. देशपांडे म्हणाले, आज जर भगतसिंह असते तर त्या कोश्यारींना खूप चोपला असता. कोश्यारींनी आपलं नाव बदलावं, असा सल्लाही त्यांनी दिला. राज ठाकरे यांनी संघाच्या कार्यक्रमात सेलिब्रिटी संदर्भात भाष्य केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना कोश्यारींनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याचाच संदर्भ घेत देशपांडेंनी कोश्यारींवर हल्लाबोल केला. कोश्यारींच्या विधानामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरल्याचेही त्यांनी सूचित केले. याचवेळी देशपांडेंनी आणखी एक गंभीर आरोप केला. उबाठा गटातील काही नगरसेवकांना प्रत्येकी एक कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती मिळाल्याचा दावा त्यांनी केला. यावरून त्यांना वेगळ्या ऑफर्स दिल्या आहेत, असे ते म्हणाले. संजय राऊत यांना याची कल्पना आहे का, की त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे, असा टोला त्यांनी लगावला. हम करे तो रासलीला आणि तुम करे तो कॅरेक्टर ढिला, असे म्हणत त्यांनी राजकीय दुटप्पीपणावरही टीका केली. देशपांडेंच्या या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा मुंबईच्या राजकारणात खळबळ माजली आहे. राजकीय टीकेबरोबरच देशपांडेंनी मुंबईतील रस्ते आणि केबल टाकण्याच्या कामांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. शहरात सिमेंट रस्त्यांची कामे सुरू असताना ते पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तेच रस्ते खोदले जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. रस्ता बनवल्यावर पुन्हा खोदण्याची गरज काय? असा सवाल त्यांनी केला. रस्ते खोदण्यास परवानगी कोणी दिली, याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. बेस्टची केबल आधीपासून असताना टाटा पॉवरला परवानगी का देण्यात आली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. टाटा पॉवरला 220 केव्ही केबल टाकण्याची परवानगी दिली असल्याचे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात ऑप्टिकल फायबर केबल टाकल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला. एक परवानगी घेऊन चार प्रकारच्या केबल का टाकल्या जात आहेत? असा थेट सवाल देशपांडेंनी उपस्थित केला. या प्रक्रियेमुळे नागरिकांना त्रास होत असून प्रशासनाला त्याचा फायदा होत नसल्याची टीका त्यांनी केली. चौकशी झाली पाहिजे या संदर्भात अधिकार्‍यांची बैठक घेतली असता समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, असे देशपांडेंनी सांगितले. त्यामुळे तक्रार नोंदवण्यात आली आहे. यापूर्वी राज ठाकरे आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी पालिकेत जाऊन आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली होती, असेही त्यांनी नमूद केले. केबल टाकण्यासाठी खड्डे भरल्याचे पैसेच पालिकेला दिले जातात, मात्र अतिरिक्त महसूल मिळत नाही, असा आरोप त्यांनी केला. अधिकार्‍यांनी नियमांच्या बाहेर जाऊन कामे केल्यास त्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. परवानगी नसताना काम करणे चुकीचे प्रशासनाच्या काळात ही कामे सुरू होती, आता नगरसेवक आवाज उठवतील अशी अपेक्षा व्यक्त करत देशपांडेंनी आपल्या नगरसेवकांनाही सक्रिय होण्याचा इशारा दिला. इलेक्ट्रिक केबल टाकण्याची परवानगी असेल तर तेवढेच काम झाले पाहिजे. ऑप्टिकल फायबर टाकण्यास परवानगी नसताना असे काम करणे चुकीचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. नियमांचे उल्लंघन थांबवण्यासाठी कडक अंकुश हवा, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

error: Content is protected !!