Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

पुण्यात भाजप – काँग्रेसच्या आंदोलनात दगडफेक:2 कार्यकर्त्यांसह पोलिस अन् पत्रकारही जखमी; महापौरांच्या हजेरीत हल्ला – काँग्रेस

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याचे तीव्र पडसाद रविवारी पुण्यात उमटले. येथे भाजप व काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात रस्त्यावर उतरले होते. त्यात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यात काँग्रेसचे 2 कार्यकर्ते जखमी झाले. या प्रकरणी स्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे. भाजपने या प्रकरणी त्यांच्यावर टीकेची झोड उठवील आहे. या प्रकरणी पुण्यात त्यांच्याविरोधात एक गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. रविवारी सकाळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या विधानाविरोधात येथील काँग्रेस भवनासमोर आंदोलन सुरू केले होते. त्यांनी जवळपास दीड तास आंदोलन केले. त्यांच्या विरोधात काँग्रेसचेही कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यावेळी दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दगडफेकीनंतर भाजप कार्यकर्त्यांचा काढता पाय यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर अचानक दगडफेक झाली. त्यात एक महिला व पुरुष कार्यकर्ता जखमी झाला. त्यांच्या डोक्यातून मोठा रक्तस्त्राव होत होता. हे चित्र पाहून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही भाजप कार्यकर्त्यांच्या दिशेने दगडफेक केली. यामुळे एकच धावपळ उडाली. या राड्यात घटनास्थळी उभ्या असणाऱ्या काही वाहनांचेही मोठे नुकसान झाले. तसेच महिला पोलिसाही जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोरून काढता पाय घेतला. पोलिसांच्या पाठिंब्याने काँग्रेस भवनावर हल्ला दुसरीकडे, काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या पाठिंब्याने काँग्रेस भवनावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस भवनाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. या बंदोबस्तातच भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दिशेने दगडफेक केली. पण पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यांना अभय दिले. या घटनेत काही कारच्या काचाही फुटल्या आहेत. तसेच काँग्रेसची एक महिला कार्यकर्ती व कार्यकर्ताही जखमी झाला आहे. यावेळी काही पोलिसांनाही दगड लागलेत, असा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांना अटक करण्याचीही मागणी केली आहे. भाजपच्या दगडफेकीत पत्रकाही जखमी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर केलेल्या दगडफेकीत काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत पत्रकार देखील जखमी झालेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. महापौरांच्या उपस्थितीत दगडफेक – प्रशांत जगताप काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांनी भाजपच्या आंदोलनाचा निषेध केला. ते म्हणाले, भाजपच्या कार्यकर्त्यांनी 6 महिन्यांत दुसऱ्यांदा काँग्रेस भवनावर हल्ला केला. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या उपस्थितीत आज आमचा एक कार्यकर्ता व कार्यकर्ती जखमी झाली. महापौरांपुढे ही दगडफेक केली जात होती. त्या उघड्या डोळ्याने तमाशा पाहत होत्या. त्यांच्या समोर ही दगडफेक केली जात होती. त्यांच्या समोर या कार्यालयाच्या आवारातील गाड्या फोडण्यात येत होत्या. त्याला महापौरांनी मूक संमती दिली. त्यामुळे महापौर मंजुषा नागपुरे व भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. या प्रकरणी कुणाच्या तरी मृत्यूला जबाबदार होण्याकरिता त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा ही आमची मागणी आहे. आम्ही या प्रकरणी फरासखाणा पोलिस स्टेशनपुढे आम्ही आंदोलनाला बसणार आहोत. या प्रकरणी जे पोलिस दोषी असतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि ज्यांनी हे आंदोलन केले आणि पुणेकरांना वेठीस धरले त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा किंवा जखमी होण्याकरिताचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी फक्त तमाशा पाहिला. त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्यांनी दोन तास रस्ता रोखून धरल्यानंतरही त्यांनी भाजपच्या लोकांवर कारवाई केली नाही. त्यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले असा आमचा आरोप आहे, असे प्रशांत जगताप म्हणाले. आत्ता पाहू काय म्हणाले होते हर्षवर्धन सपकाळ? हर्षवर्धन सपकाळ टिपू सुलतानची तुलना शिवरायांशी करताना म्हणाले होते, छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य ज्या पद्धतीचे आहे आणि त्यांनी स्वराज्य नावाचा एक विचार ज्या पद्धतीने दिला आहे, अगदी त्यांच्याच मांदियाळीमध्ये, त्यांच्यानंतर.. त्यांचा बराच कालावधी लोटल्यानंतर, त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला होता. त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले. भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधीही कुठल्याही विषारी, विखारी विचारांना जवळ केले नाही. त्यामुळे आपण एक शौर्याचे लक्षण म्हणून टिपू सुलतान यांना शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितले पाहिजे. काय म्हणाले होते मुख्यमंत्री फडणवीस? छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघलांच्या विरोधात लढाई करून स्वराज्याची निर्मिती केली. दुसरीकडे हजारो हिंदूंची कत्तल करणारा टिपू सुलतान आहे. या दोघांना एकसमान आदर दिला जावा अशी जर काँग्रेसची मागणी असेल, तर मतांच्या लांगूल चालनासाठी या लोकांनी कितीही बूट चाटले तरी महाराष्ट्र आणि देश अशा गोष्टी सहन करून घेणार नाही. छत्रपती शिवराय आणि टिपू सुलतान यांची तुलना करताना हर्षवर्धन सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे, ते कुठल्या शाळेत शिकलेत? असा बोचरा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!