टिपू सुलतानांचे वंशज भाजपमध्ये गेल्यास त्यांनाही पदे दिली जातील:हर्षवर्धन सपकाळांचा पलटवार; सावरकरांच्या सहा सोनेरी पाने, या पुस्तकाचाही उल्लेख

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर तीव्र टीका करत भाजपला संविधान बदलायचे आहे, असा गंभीर आरोप केला आहे. सोमवारी बुलढाणा येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. विशेषतः भाजप आणि टिपू सुलतान यांच्याभोवती सुरू असलेल्या वादावर त्यांनी भाष्य केले. भाजप संविधानातील महापुरुषांविषयी कायम आक्षेप घेत असल्याचा आरोप करत, टिपू सुलतानाबाबतही भाजपचे धोरण तस्सेच असल्याचे त्यांनी म्हटले. सपकाळ यांनी सांगितले की, भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे टिपू सुलतानांविरोधात सातत्याने बोलतात. मात्र राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांदरम्यान काही ठिकाणी फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभांमध्ये स्टेजच्या पार्श्वभूमीवर टिपू सुलतानाचे चित्र लावलेले दिसले, असा दावा त्यांनी केला. राजकीय सोयीनुसार भूमिका बदलण्याचे हे उदाहरण आहे, असे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की, उद्या टिपू सुलतानांचे वंशज भाजपमध्ये दाखल झाले तर त्यांनाही मोठी पदे दिली जातील, अशी टीकाही त्यांनी केली. सहा सोनेरी पाने, या पुस्तकाचा उल्लेख करत सपकाळ यांनी स्वा. सावरकर यांच्या लिखाणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचे लिहिलेले असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाजी महाराजांच्या सज्जनपणाला विकृती म्हणण्याचे धाडस करण्यात आले आहे. स्वराज्य स्थापन होणारच होते; पण कावळा बसायला आणि डांग तुटायला जसे होते, तसे शिवाजी महाराज आले, असा उल्लेख त्या पुस्तकात आहे, असे ते म्हणाले. अशा विचारांना भाजप मान्यता देते, असा आरोपही त्यांनी केला. गोंधळ निर्माण करणे हे भाजपचे धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाजी महाराजांविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना सपकाळ म्हणाले की, शिवाजी महाराज अद्वितीय आहेत आणि त्यांचे कार्य व कर्तृत्व अनुपम आहे. ते रयतेचे राजे होते आणि त्यांच्या विषयी कोणतेही चुकीचे विधान आपण केलेले नाही. दोन वेगवेगळ्या कालखंडातील महापुरुषांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, त्या संदर्भात आपण मत मांडले, असे त्यांनी सांगितले. राज्यात सध्या जाती-धर्मात तेढ निर्माण होत असल्याने सर्व महापुरुषांचे फोटो समकक्ष पातळीवर लावावेत का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्या अनुषंगाने आपण बोललो, असे त्यांनी स्पष्ट केले. दोघांचे फोटो एकत्र लावले तर त्यात गैर नाही सपकाळ पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना दिली आणि ते बहुजनांचे हिरो आहेत. त्यांच्या प्रेरणेनेच टिपू सुलतानांनी कार्य केले, असे ऐतिहासिक संदर्भ आहेत. त्यामुळे दोघांचे फोटो एकत्र लावले तर त्यात गैर नाही, असे आपण मत व्यक्त केले होते. मी कुठेही शिवाजी महाराजांचा अपमान केलेला नाही. मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून ‘ध’चा ‘मा’ करण्यात आला, असे त्यांनी सांगितले. आपले वक्तव्य चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. संविधानातच टिपू सुलतानची प्रतिमा संविधानाच्या संदर्भात बोलताना सपकाळ म्हणाले की, भारताच्या संविधानात प्रकरण 16 मध्ये प्रशासनाचा भाग सुरू होतो त्या ठिकाणी टिपू सुलतान आणि झाशीच्या राणीची प्रतिमा आहे. त्या चित्राच्या अनुषंगाने प्रशासनाचा मसुदा लिहिला गेला आहे. देशाच्या जडणघडणीत ज्यांचे योगदान आहे, अशा व्यक्तींची चित्रे संविधानात स्थान मिळालेले आहे. मात्र भाजप या बाबींवरही आक्षेप घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. भाजप याविरोधात बोलतच राहणार, कारण त्यांना संविधान बदलायचे आहे, असा गंभीर आरोप त्यांनी पुन्हा केला. भाजपवर दुटप्पी भूमिकेचा आरोप एकूणच, टिपू सुलतान आणि शिवाजी महाराज यांच्या तुलनेवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी आपली भूमिका सविस्तरपणे मांडली. आपण केलेले वक्तव्य संदर्भासह समजून घ्यावे, अशी विनंती त्यांनी केली. संविधानातील महापुरुषांविषयी आदर राखणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी भाजपवर दुटप्पी भूमिकेचा आरोप केला. या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली असून, आगामी काळात हा वाद आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!