काँग्रेसने तरी ओबीसींचे काय कल्याण केले?:विजय वडेट्टीवारांच्या टीकेला मनोज जरांगेंचे सडेतोड उत्तर, जरांगे नेमके काय म्हणाले?

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे शेतात शनिवारी सकाळी भर उन्हात सुरू केलेले बेमुदत उपोषण 15 तासांनंतर सोडले. त्यानंतर सरकारच्या एकंदरीत भूमिकेवर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी डबल ढोलकी सरकार म्हणत सडकून टीका केली आहे. तसेच लक्ष्मण हाके यांनी देखील तत्परता नव्हे तर सरकारची लाचारी म्हणत टीका केली होती. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे सध्या गॅलक्सि रुग्णालायत दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यावेळी भाजप नेते प्रसाद लाड यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, विजय वडेट्टीवार यांचे कॉंग्रेसचे सरकार असताना ओबीसींचे कल्याण केले होते का? झोके बांधून दिले होते का? काही बोलतात. ते काय धडाचे होते का? हे पण काही धडाचे नाहीत, यांनी पण मराठा आणि ओबीसी समाजासाठी काही नाही केले. आपल्या जनतेला कळत नाही का? आपण दोघांनी मिळून, ओबीसी आणि मराठा सगळ्यांनी मिळून सरकार विरोधात झुंजले पाहिजे. ते आपल्यात वाद लाऊन देतात आणि आपण सुरू. मुख्यमंत्री ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावतच नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील विजय वडेट्टीवार यांनी टीका केली होती. त्यावर विचारले असता मनोज जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ओबीसी आरक्षणाला धक्का लावतच नाहीत. आमचे जे हक्काचे आहे ते देत आहेत. आमच्या नोंदी सापडल्या आहेत तेच आपल्याला देणार आहेत. त्यांना धक्का लाऊही नका. पण आमच्या नोंदी आमच्या गॅझेटनुसार तर द्यावेच लागेल. मराठा-ओबीसीने सरकारच्या विरोधात राहिले पाहिजे मनोज जरांगे पुढे म्हणाले, कॉंग्रेसने सुद्धा ओबीसीचे वाटोळे केले होते. महायुतीच्या सरकारने सुद्धा तेच केले आहे. मराठा आणि ओबीसीने समजून घेतले पाहिजे की आपण दोघांनी मिळून सरकारच्या विरोधात राहिले पाहिजे. तुम्ही सरकारकडून राहतात आणि आमच्या विरोधात बोंबलतात. दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे, त्यावर जरांगे म्हणाले, रस्त्यावर उतरा नाहीतर ओढ्यात उतरा, कुठेही उतरा, असे म्हणत टोला लगावला आहे. मनोज जरांगेंनी दिला धनंजय मुंडेंना इशारा उपोषण सुरू असताना मनोज जरांगे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना म्हटले होते की माझी नार्को टेस्ट करा आणि अजून एकाची करा, यावर प्रश्न विचारला तेव्हा जरांगे म्हणाले, मला वाटले होते बदल झाला पाहजे. ते परळीचंच म्हणाला होता की माझी नार्को टेस्ट करा. मी नव्हतं काही म्हटले. त्यामुळे तो विषय आता मी पुन्हा हातात घेतो. त्याने कोणाला घातपात करायला लावला होता माझा? त्याला कोण पीए भेटायला जात होता परळीमध्ये, त्यात आरोपी कोण करायला पाहिजे होता, त्या आरोपींना कोण साथ देत आहे, हे सगळे आता मी लावून धरणार आहे, असे म्हणत धनंजय मुंडे यांच्यावर जरांगे यांनी इशारा दिला आहे. डबल ढोलकी सरकारने हातात घंटा देण्याचे काम केले- विजय वडेट्टीवार कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे यांच्या एकंदरीत आंदोलनावर तसेच सरकारच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, डबल ढोलकी सरकारने पुन्हा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आणि ओबीसीच्या हातात घंटा देण्याचे काम सुरू केले आहे, असे मला दिसत आहे. काल जरांगे पाटील उपोषणाला बसले आणि त्यामध्ये सरकारकडून विखे पाटलांच्या आणि प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत निघाला, खरे तर या तोडग्यात 58 लाख ज्या काही नोंदी सापडल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे म्हणजेच ओबीसीमध्ये समाविष्ट करायचे, हा निर्णय काल झाला. वाचा सविस्तर

Leave a Comment

error: Content is protected !!