बदनामीचे राजकारण थांबवा:पक्षांतराच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार आक्रमक, ‘शिंदे गटात जाणार’ चर्चांवर दिला पूर्णविराम

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला तर त्यांचे स्वागतच आहे, असे वक्तव्य केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. आपण काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता असून पक्षांतराच्या अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मी काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता विजय वडेट्टीवार म्हणाले, “मी काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. महायुती सरकारच्या अपयशावर आवाज उठवला की, माझ्याविषयी खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या अफवा पसरवल्या जातात. शिंदे गटात जाणार, पक्ष बदलणार किंवा कोणाला भेटलो अशा निराधार बातम्या पसरवून जनतेची दिशाभूल केली जात आहे.” उदय सामंत यांनी यापूर्वी महाविकास आघाडीतील नेते शिवसेनेत येत असतील तर त्यांचे स्वागत असल्याचे म्हटले होते. त्यावर अप्रत्यक्ष प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार यांनी, “माझी भूमिका स्पष्ट आहे. मी काँग्रेसच्या विचारांशी बांधील आहे. पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असे स्पष्ट केले. तसेच त्यांनी काही माध्यमांवरही टीका करत, “तथ्य नसताना अशा प्रकारचे प्रश्न विचारून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. ही पत्रकारिता नसून खोडसाळपणा आहे. आज राज्यात शेतकरी, बेरोजगारी, महागाई, कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षा आणि पायाभूत सुविधांसारखे गंभीर प्रश्न आहेत. त्यावर चर्चा होण्याऐवजी अफवा पसरवून मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोप केला. संजय दिना पाटलांचा विषय आता इथेच थांबवावा- सामंत माध्यमांशी संवाद साधताना उदय सामंत म्हणाले, “संजय दिना पाटील यांचा विषय आता इथेच थांबवावा. त्यांच्या वक्तव्यामुळे कुणाचे मन दुखावले असेल तर मीही दिलगिरी व्यक्त करतो. त्यांनी स्वतः माफी मागितली आहे आणि यापुढे ते असे काही बोलणार नाहीत.” एकनाथ शिंदेंमुळेच मी मंत्री! यावेळी त्यांनी स्वतःच्या राजकीय प्रवासाचाही उल्लेख केला. “एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मला मंत्री होण्याची संधी मिळाली. त्यामुळे शिवसेना वाढवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे,” असे सामंत म्हणाले. विजय वडेट्टीवारांच्या पक्षप्रवेशावर भाष्य
महाविकास आघाडीतील अंतर्गत घडामोडींवर बोलताना सामंत यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर महत्त्वाचे विधान केले. विजय वडेट्टीवार यांनी जर शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला, तर पक्षात एक चांगला आणि मोठा नेता येईल. महाविकास आघाडीतील नेते जर आमच्या शिवसेनेत येत असतील, तर त्यांचे नेहमीच स्वागत आहे,” असे सामंत म्हणाले. मात्र, सध्या पक्षात कोणतेही ‘ऑपरेशन’ किंवा तोडफोड सुरू नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. दरम्यान, राम मंदिरासाठी देण्यात आलेल्या देणगीवरून खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरही उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. राम मंदिराच्या संदर्भात करण्यात आलेल्या देणगीबाबत योग्य ती माहिती संबंधित ट्रस्टकडे उपलब्ध असून, विनाकारण संशय निर्माण करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सूचित केले. हे ही वाचा.. राम मंदिर देणगीवरून संजय राऊत आक्रमक:मंदिरासाठी दिलेली चांदीची वीट कुठे? पावतीही नाही, चौकशीची मागणी
अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलेल्या ४ किलो चांदीच्या विटेचा ठावठिकाणा अद्याप समोर न आल्याचा दावा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राम मंदिर ट्रस्टवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सविस्तर वाचा

Leave a Comment

error: Content is protected !!