Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या दाव्यांवर हसन मुश्रीफांनी मांडली वेगळीच बाजू:म्हणाले- जयंत पाटील माझ्याशी बोलले होते; सुनेत्रा वहिनींचाही उल्लेख

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत अनेक चर्चा आणि बैठका झाल्याच्या दाव्यांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. जयंत पाटील माझ्यासाठी बोलले होते, पण मुख्य नेत्यांना घेऊन कोणतीही बैठक झाली नव्हती, असे सांगत मुश्रीफ यांनी या चर्चांना वेगळे वळण दिले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या जाण्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि अजित पवार गट यांच्या विलिनीकरणाबाबत अनेक दावे, तर्कवितर्क आणि बैठकींच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहेत. काही नेत्यांकडून या संदर्भात बैठका झाल्याचे संकेत देण्यात आले, तर काहींनी यावर मौन बाळगले. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी केलेले वक्तव्य विशेष लक्षवेधी ठरले आहे. मुश्रीफ यांनी स्पष्ट केले की, जयंत पाटील यांनी विलिनीकरणाच्या संदर्भात त्यांच्याशी काही चर्चा केली होती. मात्र, आम्हाला घेऊन आणि शरद पवार गटातील मुख्य नेत्यांना घेऊन कोणतीही अधिकृत बैठक झाली नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे विलिनीकरणासाठी खरोखरच औपचारिक स्तरावर काही प्रक्रिया सुरू होती का, की ती केवळ चर्चेपुरती मर्यादित होती, हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे, या विषयावर मुख्यमंत्र्यांनीही खंडन केल्याचे मुश्रीफ यांनी नमूद केले. अजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना मुश्रीफ भावुक झाले. दादा किती मोठे होते, त्यांचा विकासातील वाटा किती मोठा होता, हे सर्वांना माहिती आहे. अजितदादांनंतर आम्ही पोरके झालो आहोत, असे ते म्हणाले. जे पोटात ते ओठात असं स्पष्ट बोलणारे आणि दिलेला शब्द पाळणारे नेतृत्व आता नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केली. कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी आणि पक्षाला आधार देण्यासाठी सुनेत्रा वहिनींनी दु:ख बाजूला ठेवत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. विलिनीकरणाच्या चर्चांवर बोलताना मुश्रीफ यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. आम्ही एडीएमध्ये आहोत. त्यांच्या संमतीशिवाय असे काही घडले असते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यामुळे या कथित बैठकींमध्ये नेमके कोण सहभागी होते, आणि त्या बैठकींना कितपत अधिकृत मान्यता होती, याबाबत संभ्रम वाढला आहे. जयंत पाटील यांनी अनेक बैठका झाल्याचे सांगितले असले, तरी त्या बैठकींचे स्वरूप काय होते, याबद्दल स्पष्टता नसल्याचे त्यांनी सूचित केले. मुश्रीफ यांनी सांगितले की, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांदरम्यान अजित पवारांनी काही संकेत दिले होते. ज्यांना तुतारी चिन्हावर लढायचं त्यांनी त्यावर लढा, आणि ज्यांना घड्याळ चिन्हावर लढायचं त्यांनी त्यावर लढा, असे दादांनी सांगितले होते. त्यांच्या सूचनांनुसार काही जिल्ह्यांमध्ये प्रयत्नही करण्यात आले. मात्र, हे प्रयत्न औपचारिक विलिनीकरणाच्या दिशेने होते की स्थानिक पातळीवरील निवडणूक धोरणाचा भाग होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिल्याचे मुश्रीफ यांनी मान्य केले. दादांची दोन्ही राष्ट्रवादी एक व्हावी अशी इच्छा होती का? या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, अशा चर्चा आमच्यासमोर कधी झालेल्या नाहीत. त्यांनी ऐकलेल्या वक्तव्यांवरून काही संकेत मिळत असले, तरी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना सामावून घेऊन कोणतीही औपचारिक चर्चा झाल्याचे त्यांना ठाऊक नसल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले. पक्ष एकत्र ठेवणे हीच सध्याची प्राथमिकता राजकीय वर्तुळात सध्या दोन महत्त्वाचे प्रश्न चर्चेत आहेत, विलिनीकरण झाले असते तर शरद पवार भाजपसोबत सत्तेत गेले असते का, की अजित पवार सरकारमधून बाहेर पडले असते? या प्रश्नांवर अद्याप कोणतीही ठोस भूमिका समोर आलेली नाही. मुश्रीफ यांच्या वक्तव्यानंतर मात्र हे स्पष्ट झाले आहे की, या संदर्भातील अनेक चर्चा अजूनही पडद्यामागे आहेत. यथावकाश सुनेत्रा वहिनी आणि पवार परिवार जे ठरवतील, त्यानुसार पुढील दिशा निश्चित होईल, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, कार्यकर्त्यांना धीर देणे आणि पक्ष एकत्र ठेवणे हीच सध्याची प्राथमिकता असल्याचे मुश्रीफ यांच्या वक्तव्यातून स्पष्टपणे दिसून येते.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!