राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या मुद्यावरून सत्ताधारी भाजपवर निशाणा साधत उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. साताऱ्यात लोकशाहीचा दिवसाढवळ्या खून झाला. भाजप सत्तेसाठी सख्ख्या मित्रालाही गिळायला मागेपुढे पाहात नाही हे यावरून स्पष्ट होते, असे ते म्हणालेत. राज्याच्या राजकारणात सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची गरमागरम चर्चा सुरू आहे. या निवडणुकीत जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेचे आज विधिमंडळात तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करत चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी भाजप सत्तेसाठी सख्या मित्रालाही गिळायला मागे पुढे पाहत नाही हे आता शिवसेना शिंदे गटाला आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला कळलेच असेल, असा चिमटा काढला आहे. नेमके काय म्हणाले रोहित पवार? रोहित पवार आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, एका जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी गृहखात्याची अफाट ताकद वापरण्यापेक्षा ती अजितदादांच्या अनैसर्गिक पद्धतीने झालेल्या मृत्यूच्या चौकशीसाठी वापरली तर विरोधक असूनही आम्हीही या निर्णयाचं मनापासून स्वागतच केलं असतं, पण त्याऐवजी साताऱ्यात गृहखात्याच्या आशीर्वादाने लोकशाहीचा ढवळ्यादिवसा खून पडतोय, मंत्र्याशीही झटापट करुन त्यांना दुखापत केली जाते आणि याविरोधात खुद्द मंत्र्यांनाच विधीमंडळापुढं आंदोलनही करावं लागतंय. यावरुन भाजपाने कधीकाळी विचारलेला प्रश्न आज नव्याने त्यांनाच विचारण्याची गरज आहे. कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? पण काहीही असो, सत्तेसाठी सख्या मित्रालाही गिळायला भाजपा मागंपुढं बघत नाही, हे यानिमित्ताने शिवसेना शिंदे गटाला आणि अजितदादा गटाला कळलंच असेल, असे ते म्हणालेत. सातारा ZP निवडणुकीत काय घडले? मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानपरिषदेत सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नेमका काय घटनाक्रम घडला याची सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणाले, आम्ही 33 सदस्य मतदानासाठी जात होतो. आमची बैठक झाली. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा उमेदवार कोण हे ठरले. संदीप मांडवे व अनिल देसाई या 2 सदस्यांवर गुन्हा दाखल झाला ते आमच्याबरोबर बैठकीला हजर होते. ज्यांचे अपहरण झाले म्हणून सांगण्यात आले, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य बापूसाहेब शिंदेही आमच्यासोबत होते. बैठकीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिस होते. त्यांनी आम्हाला मारहाण केली. पोलिसांची कृती पाहून या सभागृहातही आम्ही सुरक्षित आहेत की नाही? असे म्हणण्याची वेळ आली आहे. आम्ही चौथ्या मजल्यावर चाललो होतो. मांडवे म्हणत होते की पालकमंत्री आहेत, मला मतदानासाठी जाऊ द्या. त्यावेळी चार-चार पोलिसांनी आमच्या दोन्ही दंडांना, दोघांनी कंबरेला धरून सदस्यांसकट फरपटत घेऊन गेले. खासदार नितीनकाका यांना पायऱ्यांवरून खाली पाडले. साध्या वेशातील शंभर पोलिस होते. ही काय मोगलाई आहे का? आम्ही मंत्री आहोत, आमदार आहोत, चार लाख लोकांतून निवडून आलो आहोत. पण आमच्यासोबत एवढा मुजोरपणा केला. त्या गोंधळात मला काय लागले माहिती नाही. माझ्या शर्टवर रक्त, संदीप मांडवे यांच्या शर्टवर रक्त होते. ही गोष्ट माझ्या अंगरक्षकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने रुमाल काढून दिला. तोपर्यंत आमच्या दोन्ही सदस्यांना पोलिस पळवत घेऊन गेले. या प्रकरणात पोलिस अधीक्षक एखाद्या घरगड्यासारखे वागले. माझी विनंती आहे की, त्यांना तात्काळ निलंबित करा, सेवेतून बडतर्फ करा. त्यांची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत त्यांची चौकशी करा, अशी मागणी शंभूराज देसाई यांनी सभागृहात केली.
