शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाला गालबोट:मध्यरात्री चेंगराचेंगरी सदृश स्थिती, अनेक जण जखमी; प्रशासकीय नियोजनाचा फज्जा

पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीच्या सोहळ्याला आज गालबोट लागले. शिवरायांच्या जन्मस्थानी दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो शिवभक्तांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला अपयश आल्याने गडावर चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती निर्माण झाली. या गोंधळात अनेक जण जखमी झाले असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवजयंती निमित्त काल मध्यरात्रीपासूनच शिवनेरीवर शिवज्योत घेऊन येणारे युवक आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. आज सकाळी ही गर्दी लाखांच्या घरात पोहोचली. गडावरील अंबरखाना, हत्ती दरवाजा आणि गणेश दरवाजा हे मार्ग अत्यंत अरुंद आहेत. या भागात अचानक गर्दीचा दाब वाढला आणि लोक एकमेकांवर पडू लागले. एकाच वेळी हजारो लोक पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. प्रशासकीय नियोजनाचा फज्जा दरवर्षी शिवनेरीवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होते, हे माहीत असतानाही यंदा पोलीस बंदोबस्त पुरेसा नसल्याचे दिसून आले. अरुंद वाटांवर बॅरिकेडिंग किंवा एकेरी वाहतुकीचे (Entry-Exit Plan) नियोजन नसल्याने ही दुर्घटना घडली. . जखमींना तातडीने जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे भाविकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. जखमींची माहिती पाय फ्रॅक्चर झालेले शिवभक्त : शंकर उत्तम रहाणे (वय २६, रा. संगमनेर) आणि दिगांबर वसंत क्षीरसागर (वय ३८, रा. मंचर) या दोघांचेही पाय फ्रॅक्चर झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहे. भाजलेले शिवभक्त : भूषण विलास आरोटे (वय २२, रा. अकोले) यांच्या अंगावर पेटती मशाल पडल्याने त्यांचा चेहरा भाजला आहे. त्यांच्यावर जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर जखमी : आकाश काशिनाथ टेमगिरे (वय २९), सागर संतोष वाजे (वय २४), रेहान शेख (वय १९), अनिकेत अरुण पानमंद (वय २८) आणि दीपक गोडसे (वय ३०) या भाविकांना किरकोळ मार लागला होता. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पुढील उपाययोजनेची मागणी या घटनेनंतर आता भविष्यातील मोठ्या उत्सवांसाठी ‘क्राउड मॅनेजमेंट’ (Crowd Management) आणि आपत्कालीन वैद्यकीय पथकांचे चोख नियोजन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गडावरील अरुंद वाटांचा विचार करून भाविकांची संख्या मर्यादित ठेवणे किंवा पर्यायी मार्गांचा विचार करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गडावरून येताना तरुण पाय घसरून पडला पुणे ग्रामीणचे एसपी संदीप सिंग गिल यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी येथे सकाळपासूनच मोठ्या संख्येने भाविक श्रद्धांजली वाहण्यासाठी जमले आहेत. दरम्यान, पहाटे साडेतीन वाजता, शिवज्योत घेऊन भाविकांचा एक गट रेलिंगवरून वेगाने खाली येत होता. तेथे पोलिसांचे एक पथक होते, ते वेगाने खाली येत होते, त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तोपर्यंत लोक एकमेकांवर कोसळले, त्यापैकी ३ जणांच्या पायांना दुखापत झाली, एकाचा पाय मुरगळला आणि २ जणांना किरकोळ दुखापत झाली.

Leave a Comment

error: Content is protected !!