Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार रिंगणात:पक्षाच्या कोअर कमिटीचे मोठे निर्णय; राज्यसभा आणि राष्ट्रीय अध्यक्षपद, राष्ट्रवादीत घडामोडींना वेग

बारामती विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे ही जागा रिक्त झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाने या मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. 1 जानेवारी 2026 पर्यंत नाव नोंदविलेल्या मतदारांना पोटनिवडणुकीत मतदानाचा अधिकार असेल. 10 मार्च रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार असून त्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढवणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत यावर एकमत झाल्याची माहिती आहे. पक्षाने ही निवडणूक शक्यतो बिनविरोध करण्याचा प्रयत्न करावा, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली. प्रारूप मतदारयादी 10 मार्चला जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना अधिक वेग येईल, असे चित्र आहे. बारामतीतील या घडामोडींप्रमाणेच राज्यसभेच्या निवडणुकीबाबतही राष्ट्रवादी काँग्रेसने निर्णय घेतला आहे. आगामी राज्यसभा निवडणुकीत पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्री मुंबईत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ही बैठक प्रफुल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी पार पडली. बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच कोअर कमिटीचे अन्य सदस्य उपस्थित होते. या बैठकीत 26 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसंदर्भातील राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीची तयारीही आढळून आली. येत्या काही दिवसांत वरळी डोम येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पक्ष संघटनेत मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यपालांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राज्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच एका महिलेने उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळल्याने हा क्षण ऐतिहासिक मानला जात आहे. त्यांच्या शपथविधीनंतर बारामती आणि राज्यभरात पुढील राजकीय समीकरणांबाबत चर्चा सुरू झाली. सहा महिन्यांच्या संवैधानिक अटीची पूर्तता भारतीय संविधानातील कलम 164(4) नुसार एखादी व्यक्ती राज्याच्या विधिमंडळाची सदस्य नसतानाही मंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री म्हणून नियुक्त होऊ शकते. मात्र शपथ घेतल्यापासून सहा महिन्यांच्या आत त्या व्यक्तीने विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य होणे आवश्यक असते. अन्यथा पदाचा राजीनामा द्यावा लागतो. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. सहा महिन्यांच्या संवैधानिक अटीची पूर्तता करण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. पक्ष बिनविरोध निवडणूक होण्यासाठी प्रयत्नशील एकूणच बारामती पोटनिवडणूक, राज्यसभा उमेदवारी आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीच्या हालचाली यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानंतर अधिकृत घोषणा झाल्यावर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. पक्ष बिनविरोध निवडणूक होण्यासाठी प्रयत्नशील असला तरी विरोधकांची भूमिका काय असेल, याकडेही लक्ष लागले आहे. आगामी काही आठवडे राज्याच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!