सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट:115 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात रेड शेडवर नाही, शिंदेंच्या रिसॉर्टवरच; ‘पालकमंत्री ढ’ म्हणत टीका

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील दरे गावाजवळील सावरी परिसरात 115 कोटी रुपयांचा आणि सुमारे 45 किलो वजनाचा ड्रग्ज साठा जप्त झाल्याची घटना समोर आल्यानंतर हे प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर व वादग्रस्त बनत चालले आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर संबंधित हॉटेल आणि मालमत्तेच्या मालकीबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. ही मालमत्ता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ प्रकाश शिंदे यांच्या मालकीची असून तिची देखभाल दरे गावचे सरपंच रणजीत शिंदे करत असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, या संपूर्ण प्रकरणात दबावामुळे कारवाई थंडावल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून सातत्याने केला जात आहे. या प्रकरणाला आता नवे वळण देत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गंभीर आरोप आणि प्रश्न उपस्थित केले आहेत. सुषमा अंधारे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सावरी, जिल्हा सातारा येथे ड्रग्जसंदर्भात धाड पडून जवळपास महिना लोटला असतानाही अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. मुलुंड आणि वर्धा येथे धाड पडल्याची माहिती तत्काळ जाहीर झाली होती, पुण्यातून विशाल मोरे याला अटक झाल्याचंही कळालं होतं. मात्र, 115 कोटींच्या ड्रग्जसारख्या मोठ्या प्रकरणात ना पत्रकार परिषद, ना सीसीटीव्ही फुटेज, ना जबाबदार अधिकाऱ्यांची माहिती पुढे येत असल्याने संशय अधिक गडद होत असल्याचं त्यांनी नमूद केलं. सुषमा अंधारे यांनी प्रकाश शिंदे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, प्रकाश शिंदे हे या प्रॉपर्टीशी आपला संबंध नसल्याचं सांगत असून, ती मालमत्ता विकल्याचा दावा करत आहेत. मात्र, हा दावा खोटा असल्याचा आरोप अंधारेंनी केला. त्यांनी उदाहरण देत सांगितले की, शाहरुख खानच्या मुलाच्या प्रकरणात केवळ काही ग्रॅम ड्रग्ज सापडले असतानाही मोठ्या प्रमाणावर कारवाई आणि पत्रकार परिषदा झाल्या. मग सावरी येथे 115 कोटींचा ड्रग्ज साठा सापडूनही अशी शांतता का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. या पत्रकार परिषदेत त्यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित करत रेड टाकणारे पोलिस निरीक्षक आत्मजित सावंत सध्या कुठे आहेत, असा प्रश्न विचारला. त्यांच्या जिवाला काही धोका आहे का, ते सुरक्षित आहेत का, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती का दिली जात नाही, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. एवढ्या मोठ्या कारवाईनंतर संबंधित अधिकारीच समोर येत नसतील तर सामान्य नागरिकांनी विश्वास कसा ठेवायचा, असा सवालही त्यांनी केला. शंभूराज देसाई पालकमंत्री म्हणून ढ पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावरही सुषमा अंधारेंनी जोरदार टीका केली. सावरी परिसरातील बॅकवॉटर भागात मोठ्या प्रमाणावर बांधकाम झाले असून सुमारे 1200 मीटरचे रस्ते उभारण्यात आले आहेत. हे बांधकाम कोणी केले, त्यासाठी परवानगी कोणी दिली, याची माहिती पालकमंत्री देसाई का देत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रकाश शिंदे यांनी दाखवलेली कागदपत्रे ही सर्वे नंबर 17 ची असून प्रत्यक्षात संबंधित मालमत्ता सर्वे नंबर 13 मधील असल्याचा दावा करत त्यांनी संपूर्ण प्रकरणात दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला. यावरूनच त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पालकमंत्री म्हणून ढ असल्याचा घणाघात केला. संशयित किंवा संबंधित व्यक्ती गायब असणं हे गंभीर या ड्रग्ज प्रकरणातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे स्पॉटवर उपस्थित असलेला ओंकार डिगे सध्या कुठे आहे, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचं अंधारेंनी सांगितलं. संबंधित गावचा सरपंच, जो युवा सेनेचा पदाधिकारी असल्याचं सांगितलं जातं, तोही सध्या कुठे आहे, याबाबत स्पष्टता नाही. 115 कोटींचा ड्रग्ज साठा सापडूनही प्रमुख संशयित किंवा संबंधित व्यक्ती गायब असणं हे अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी ठामपणे मांडलं. रेड केवळ शेडवर नव्हे, तर थेट रिसॉर्टवर सुषमा अंधारे यांनी केलेला सर्वात मोठा गौप्यस्फोट म्हणजे ही रेड केवळ शेडवर नव्हे, तर थेट प्रकाश शिंदे यांच्या रिसॉर्टवर पडल्याचा दावा. संबंधित लोक हे त्या रिसॉर्टमध्येच राहत होते आणि तिथेच ड्रग्ज साठा आढळून आला, असं त्यांनी स्पष्ट केलं. यावरूनच त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर खुलासा करणार का, असा सवाल उपस्थित केला. तसेच ओंकार डिगेला अटक कधी होणार, अनधिकृत बांधकाम अजून का पाडलेले नाही, ड्रग्जच्या धंद्याला पालकमंत्र्यांचा पाठिंबा आहे का, असे अनेक थेट प्रश्न त्यांनी सरकार आणि प्रशासनासमोर ठेवले. तर रस्त्यावर उतरून लढाई लढावी लागेल या संपूर्ण प्रकरणामुळे सातारा ड्रग्ज केस आता केवळ गुन्हेगारी बाब न राहता मोठा राजकीय वाद बनत चालला आहे. पोलिस प्रशासनाची भूमिका, सत्ताधाऱ्यांची शांतता आणि विरोधकांचे आरोप यामुळे हे प्रकरण राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आले आहे. पुढील काळात या प्रकरणावर सरकार काय भूमिका घेते आणि उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळतात का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या प्रकरणात आपल्याला रस्त्यावर उतरून लढाई लढावी लागेल, असा इशाराही अंधारे यांनी दिला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!