महाराष्ट्र राज्य किसान सभा व महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या (लालबावटा) तिवसा तालुका शाखेच्यावतीने आज, सोमवारी, महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. ग्राहकांकडून सध्याच्या मीटरबाबत कोणतीही तक्रार नसताना केवळ अदानी कंपनीच्या फायद्यासाठी जुने मीटर बदलून सक्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा सपाटा शासनाने लावला असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. हे नवीन स्मार्ट मीटर बसवताच वीजबिलात थेट १०० ते २०० टक्क्यांची वाढ होत आहे. यामुळे आधीच संकटात सापडलेला शेतकरी व शेतमजूर पूर्णपणे कोलमडला आहे. वीज ही मानवी जीवनाची मूलभूत गरज असताना वीज कंपन्या व सरकार युनिट दर १५ पैशांवरून थेट १५ रुपयांपर्यंत वाढवत आहेत. ग्राहकांची ऊसासारखी पिळवणूक होत असल्याची संतप्त भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या जाचक धोरणाचा निषेध करत आंदोलकांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यांची भेट घेतली. त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनामध्ये स्मार्ट मीटरची सक्ती बंद करा. शंका असेल तर आहे त्याच मीटरची तांत्रिक तपासणी करा. पंजाब व तामिळनाडू सरकारच्या धर्तीवर स्मार्ट मीटर न बसवण्याचा अधिकृत निर्णय घ्या. वीज दरवाढ मागे घ्या. २४ तास वीज पुरवठा करा. कृषी पंपांसाठी सोलरची सक्ती मागे घ्या. शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवा. निवडणुकीत एन.डी.ए.ने घोषणा केल्याप्रमाणे २०० युनिट वीज मोफत देण्याच्या आश्वासनाची अंमलबजावणी करा. या मागण्यांचा समावेश आहे. आंदोलनात किसान सभा व शेतमजूर युनियनचे प्रकाश सोनोने, चंद्रकांत वडस्कर, राजाभाऊ बाभुळकर, मनोहर वाढोणकर, जितेंद्र कोरडे, सलीम खॉ, देवेंद्र बावणे, अंबादास जुवारे, दिलीप गोहत्रे, संजय गोरडे, सुरेश राउत, श्रीकृष्ण लांजेवार, निरंजन बेले, विलास हांडे, सुरेश ढोरे, राहुल ढोरे, सचिन बारवाल, अशोक भेलकर, प्रवीण घुरडे, नथ्युजी फरकाळे, दिलीपसिंह नाहटा, तस्लीमा बेग, अरून सुने, अनिकेत खुळे, दिनेश लिलव्हे, सय्यद आशिक, सयरा परविन, गुलखॉ, सरफोदीन काजी, शेख आरीफ तसेच वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा महासचिव सागर भवते, प्रशांत काबळे, मनिष खरे, मिलींद यावले यांच्यासह अनेक वीज ग्राहक सहभागी झाले होते.जुने मीटर बदलून सक्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा सपाटा शासनाने लावला असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
