पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांचा इशारा:धूलिवंदनाच्या दिवशी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करणार

हिंगोली शहरासह जिल्हाभरात होळी व धूलिवंदनाच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांनी दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात होळी व धूलिवंदनाचा सण उत्साहात व शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलिस दलाकडून विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. ग्रामीण भागातून बेकायदेशीर रित्या गावठी दारू गाळप व विक्री होणार नाही याकडे लक्ष दिले जाणार आहे. याशिवाय देशी व विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. वाहनांच्या तपासणीसाठी जिल्ह्यातील १३ पोलिस ठाणे अंतर्गत विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. याशिवाय स्थानिक गुन्हे शाखेची चार पथकेही कार्यरत असणार आहेत. या पथकाच्या माध्यमातून चार चाकी, दुचाकी वाहनांसह ऑटोची तपासणी केली जाणार असून दारूची वाहतूक करणारी वाहने जप्त करून चालकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. त्यासाठी रविवार ता एक पासून वाहनांची तपासणी मोहीम हाती घेतली जाणार आहे. हिंगोली शहरात वाहतूक शाखेच्या वतीने वाहन तपासणी केली जाईल. शहरासह जिल्ह्यात मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. या संदर्भातील स्पष्ट आदेश जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत. संवेदनशील भागामध्ये पोलिस विभागाची गस्त राहणार आहे. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याबाबत विशेष दक्षता घेण्यात आली आहे. तर मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी वाहन चालकांची ब्रिथ ऍनालायझर द्वारे तपासणी केली जाणार आहे. याशिवाय ग्रामीण भागांमधून होणाऱ्या पार्ट्यांवरही लक्ष ठेवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनीही होळी व धुलीवंदनाचा सण उत्साहात व शांततेत साजरा करावा तसेच धुलीवंदनाच्या दिवशी नैसर्गिक रंगाचा वापर करावा असे आवाहन पोलिस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी केले.

Leave a Comment

error: Content is protected !!