राज्यातील 24 नगरपरिषदांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यानंतर उद्या रविवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील. तत्पूर्वी, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. उद्याचा निकाल भाजप व महायुतीसाठी विजयाचा दिवस असणार आहे. भाजपला कधी मिळाले नाही एवढे यश या निवडणुकीत मिळेल. विशेषतः जिथे आम्ही कधीच जिंकलो नव्हतो, त्या नगरपालिकांवरही भाजपची सत्ता येईल, असे ते म्हणालेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असल्याचा दावा केला. ते म्हणाले, उद्याचा निकाल भाजप व महायुतीसाठी विजयाचा दिवस असणार आहे. भाजपला कदी मिळाले नाही एवढे यश नगरपरिषद निवडणुकीत मिळेल. आम्ही जिथे कधीच जिंकलो नव्हतो त्या नगरपालिकाही आम्ही जिंकणार आहोत. प्रचारात आम्ही पाहिले की, मतदारांचा कल भाजपच्या बाजूने आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीसोबत नाही. हा अजित पवारांच्या पक्षाचा अधिकार आहे. त्यांचा निर्णय अजित पवार, सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल घेतील. मित्रपक्षांत कटूता येणार नाही याची काळजी घेणार ते पुढे म्हणाले, आम्ही महायुती म्हणून जनतेच्या समोर जात आहोत. कार्यकर्ते आमच्याकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा ठेवून आहेत. पण सर्वांना संधी देणे शक्य नाही. त्यामुळे काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस वेगळे लढेल. तिथे आमच्यात मैत्रीपूर्ण लढत होईल. या प्रकरणी कटूता निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल. मुंबईतील जागावाटप दोन दिवसांत होील. भाजप व शिवसेनेची कोअर कमिटी याविषयी अंतिम निर्णय घेईल. पहिल्या टप्प्यात शिवसेना व भाजपचे कोअर कमिटी सदस्य चर्चेसाठी बसत आहेत. जिथे कमी जागा आणि जास्त दावेदारी आहे, तिथे काही अडचणी आहेत. पण शेवटी निर्णय अजित पवारांना घ्यायचा आहे. त्यामुळे आम्ही त्यावर काहीही बोलू शकत नाही. आज पुणे, पिंपरी चिंचवड येथील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये येत आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी भाजपचा महापौर होईल यात शंका नाही, असे ते म्हणाले. वडेट्टीवारांचा बावनकुळेंवर निशाणा दुसरीकडे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बावनकुळेंनी विजयाबद्दल व्यक्त केलेल्या ठाम विश्वासाचा समाचार घेतला आहे. वडेट्टीवार म्हणाले, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे पैसा व बोगस या मतदानाच्या जोरावर भाजपच्या विजयाचा दावा करत आहेत. माझ्याकडे जी माहिती आली त्यानुसार, नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी भाजपने मोठा जोर लावला आहे. भाजप तिथे एका मतासाठी प्रत्येकी 50 हजार रुपये देत आहे. छोटी नगरपरिषद आहे. पण एका प्रभागामध्ये 700 ते 1200 मतदान आहेत. एवढ्या छोट्या पालिकेसाठी भाजप 40 कोटी रुपये खर्च करत आहे. त्यामुळे त्यांनी आम्ही जिंकलो म्हणून आत्ताच गुलाल उधळावा. त्यांनी निकालाचीही वाट पाहू नये, असे ते म्हणाले.
