हरकत असेल तर तक्रार करा, पण बाप काढणे योग्य नाही:विधिमंडळाच्या पोर्चमध्ये आमदार जाधव-कल्याणशेट्टींमध्ये शब्दयुद्ध

मुंबईत सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना मंगळवारी आणखी एक नवा वाद समोर आला. आमदार सचिन कल्यणाशेट्टी आणि आमदार भास्कर जाधव यांच्यात विधिमंडळ परिसरातच जोरदार शाब्दिक चकमक झाली. विधानसभा इमारतीच्या पोर्चमध्ये दोन्ही आमदार आमनेसामने आल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तुम्ही बाप का काढला? या प्रश्नावरून हा वाद चांगलाच रंगला. उपस्थित आमदार, कर्मचारी आणि कार्यकर्त्यांसमोर झालेल्या या बाचाबाचीमुळे अधिवेशनाच्या चर्चांना वेगळे वळण मिळाले. सध्या सुरू असलेले बजेट सेशन विविध मुद्द्यांमुळे वादग्रस्त ठरत आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भातील संशय, तसेच इतर राजकीय घडामोडींमुळे सभागृहात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच हा नवा वाद उफाळून आला. माहितीप्रमाणे, विधानसभा आमदार राहुल आवाडे यांची मुलगी सानिका आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे चिरंजीव अजय यांच्या विवाहसोहळ्याची पत्रिका आमदारांच्या खासगी सहाय्यकांकडून विधिमंडळ परिसरात वाटली जात होती. एकाच ठिकाणी सर्व सदस्य उपस्थित असल्याने सोयीसाठी हे वाटप सुरू होते. याच पत्रिका वाटपावरून नाराजी व्यक्त करताना भास्कर जाधव यांनी तीव्र शब्दांत टीका केल्याचे सांगितले जाते. विधिमंडळ आवारात अशा प्रकारे पत्रिका वाटणे योग्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली. या चर्चेदरम्यान जाधव यांच्या बोलण्यात सरकारचा बाप, असा उल्लेख झाल्याचा आरोप सचिन कल्याणशेट्टी यांनी केला. हा शब्दप्रयोग ऐकताच कल्याणशेट्टी संतापले आणि त्यांनी जाधवांना थेट जाब विचारला. तुम्ही बाप काढलाय, तुम्हाला तो अधिकार आहे का? तुम्ही ज्येष्ठ सदस्य आहात. तुम्ही बाप काढला तर मीही काढेल, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटल्याची माहिती समोर आली आहे. या प्रश्नावर भास्कर जाधव यांनीही तितक्याच ठामपणे उत्तर दिले. तुम्हाला माझा बाप काढायचा असेल तर काढा, असे प्रत्युत्तर त्यांनी दिल्याचे सांगितले जाते. दोन्ही आमदारांमधील ही शाब्दिक देवाणघेवाण काही काळ सुरू राहिली. परिसरात उपस्थित असलेल्या सदस्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे विधिमंडळाच्या पोर्चमध्ये काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. हरकत असेल तर तक्रार करा, पण बाप काढणे योग्य नाही – कल्याणशेट्टी घटनेनंतर माध्यमांशी बोलताना सचिन कल्याणशेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. भास्कर जाधव हे कर्मचाऱ्यांवर रागावत होते, असे त्यांनी सांगितले. मी सभागृहात प्रवेश करत होतो. तेव्हा ते सरकारचा बाप काढत होते. अपशब्द माझ्या कानावर पडले. म्हणून मी त्यांना सांगितले की, काही हरकत असेल तर अधिकृत तक्रार करा. पण कोणाचा किंवा सरकारचा बाप काढणे योग्य नाही, असे कल्याणशेट्टी म्हणाले. विधिमंडळ हे कुटुंबासारखे आहे, लग्नपत्रिका एकमेकांना देणे ही परंपरा आहे, असेही त्यांनी नमूद केले. विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्यामुळे भास्कर जाधव नाराज कल्याणशेट्टी यांनी पुढे असेही म्हटले की, विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्यामुळे भास्कर जाधव नाराज असावेत आणि त्यातूनच त्यांनी अशी भूमिका घेतली असावी. मात्र, कोणत्याही परिस्थितीत अशा शब्दांचा वापर अयोग्य असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. दुसरीकडे, या घटनेमुळे अधिवेशनातील वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आधीच विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेले असताना, या नव्या वादामुळे राजकीय चर्चा अधिकच रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!