माझे मन अत्यंत जड झालेय..:अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी CM देवेंद्र फडणवीस भावुक, अजितदादांच्या स्मरणार्थ दोन मोठ्या घोषणा

राज्याचा अर्थसंकल्प आज विधीमंडळात सादर होत आहे. मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे फडणवीस यांनी अर्थ खात्याची जबाबदारी स्वतःकडे घेतली आहे. आज अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांच्या नावाने दोन मोठ्या घोषणा देखील केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे भाषण करताना माझे मन अत्यंत जड झाले आहे. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रीपद आणि दीर्घकाळ वित्त विभागाची धुरा सांभाळणारे अजितदादा पवार आज आपल्यात नाहीत. अजितदादा यांनी 11 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. अजितदादा व अर्थसंकल्प हे नाते दृढ झाले होते. काम करणारा माणूस ही त्यांची ओळख आणि त्यांनी दिलेली विकासाची दिशा आजही आपल्याला प्रेरणा देत आहे. अजितदादांच्या नावे नागरीसेवा पुरस्कार देण्यात येणार पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजितदादांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे भव्य स्मारक उभारण्यात येईल. तसेच त्यांच्या नावे गतिमान नागरीसेवा पुरस्कार देण्यात येईल असे मी जाहीर करतो. दिवंगत अजितदादांच्या स्मृतींना आजचा अर्थसंकल्प समर्पित करतो, असे फडणवीस यांनी म्हटले. 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवारांचे अपघाती निधन दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळावर झालेल्या एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून, सकाळी पावणे नऊच्या सुमारास धावपट्टीवर उतरताना विमानाने पेट घेतल्याने ही दुर्घटना घडली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, या विमानामध्ये अजित पवारांसह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, सुरक्षा रक्षक विदिप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे सर्वजण प्रवास करत होते आणि या सर्वांचाच या अपघातात अंत झाला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!