धर्मेंद्र प्रधान यांनी अजून राजीनामा का दिला नाही?:आंबेडकरांचा नीट पेपरफुटी प्रकरणी सवाल; नीट परीक्षा UPSC कडे सोपवण्याची मागणी

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अद्याप राजीनामा का दिला नाही? त्यांचा उद्दामपणा व अहंकार त्यांना राजीनामा देण्यापासून रोखत आहे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी नीट परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया NTA कडू काढून घेऊन UPSC कडे सोपवण्याचीही मागणी केली. नीट 2026 परीक्षा गत 3 मे रोजी झाली. पण अवघ्या 3 दिवसांतच हा पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले. अखेर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) संपूर्ण नीट परीक्षाच रद्दबातल करत देशातील 23 लाख विद्यार्थ्यांना जबर झटका दिला. आता ही परीक्षा 21 जून रोजी होणार आहे. नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे देशभरातील 6 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत मृत्यूला कवटाळले आहे. तर या पेपरफुटीप्रकरणी आतापर्यंत 10 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. विरोधकांनी या प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पण तूर्त तरी केंद्राने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. नीट परीक्षा घेण्याची जबाबदारी यूपीएससीकडे सोपवा या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत तिखट शब्दांत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आंबेडकरांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारताचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अद्याप राजीनामा का दिला नाही? त्यांचा उद्दामपणा व अहंकार त्यांना राजीनामा देण्यापासून रोखत आहे. त्यांचा हा उद्दामपणा त्यांच्या मंत्रिपदाच्या खुर्चीविषयीची आसक्ती व NEET-UG 2026 ची प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे देशातील 23 लाख विद्यार्थ्यांचे कष्ट वाया गेले, हे वास्तव स्वीकारण्याची अनिच्छा दिसून येते. सरकारने नीट परीक्षेच्या प्रक्रियेत सुधारणा करावी व ही परीक्षा घेण्याची जबाबदारी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (यूपीएससी) सोपवण्यात यावी. पण तत्पूर्वी, धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी तब्बल 23 लाख विद्यार्थ्यांचे करिअर व भविष्य धोक्यात टाकले आहे, असे ते म्हणाले. पेपरफुटीमुळे देशात संतापचे वातावरण दुसरीकडे, नीट पेपरफुटीमुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. लाखो विद्यार्थ्यांनी अनेक महिने मेहन घेतल्यानंतर परीक्षा दिली होती. पण परीक्षा प्रक्रियेवरच संशय निर्माण झाल्यामुळे विद्यार्थी व पालकांत तीव्र नाराजी पसरली आहे. विविध राज्यातील विद्यार्थी या प्रकरणी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. विरोधी पक्षांकडूनही कंद्र सरकार व शिक्षण मंत्रालयावर टीकेची झोड उठवली जात आहे. परीक्षा प्रक्रियेत वारंवार होणारे कथित घोटाळे, प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकार व व्यवस्थापनातील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. दुसरीकडे, केंद्राकडून या प्रकरणी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे नीट परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता व पारदर्शकता यावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित हा मुद्दा आगामी काळात आणखी गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!