राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून भारतीय हवामान विभागाने १ जुलैपर्यंत राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसह राज्यातील जवळपास २४ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून काही भागांत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हवामानातील या बदलामुळे संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण आहे. नद्यांना पूर, विहिरींच्या पाणीपातळीत वाढ
गेल्या २४ तासांत झालेल्या जोरदार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील अंजनविहिरे गावातील झीरी नदीला पहिला पूर आला असून येथील बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. या पावसामुळे परिसरातील विहिरी आणि बोरवेलच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून जलस्त्रोत जिवंत झाले आहेत. तसेच गोंदिया आणि नंदुरबार जिल्ह्यातही पावसाने चांगली हजेरी लावली आहे. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यात सर्वाधिक ३३.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा
यंदा मान्सून केरळमध्ये उशिरा दाखल झाला आणि त्यानंतर सुमारे १५ दिवस अरबी समुद्रातच रेंगाळल्याने राज्यातील खरिपाच्या पेरण्या पूर्णपणे रखडल्या होत्या. मात्र, आता जूनअखेर सुरू झालेल्या या दमदार पावसामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे रखडलेल्या पेरणीच्या कामांना आता संपूर्ण राज्यात वेग येणार आहे. उकाड्यापासून नागरिकांना सुटका
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नागरिक आणि शेतकरी तीव्र उकाड्यामुळे कमालीचे त्रस्त झाले होते. या पावसामुळे आता वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या या पावसामुळे सध्यातरी सर्वसामान्य नागरिक आणि बळीराजा यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये मनपाचा ‘मान्सून टास्क फोर्स’ सज्ज; ६ विभागांत विशेष पथके पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी महापालिकेने ‘मान्सून टास्क फोर्स’ कार्यान्वित केला आहे. शहरातील पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यादरम्यान आणि पावसाळ्यानंतर उद्भवणाऱ्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी पालिकेच्या सहा विभागांत सहा विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ही पथके आजपासून कार्यरत झाली आहेत. प्रत्येक पथक संबंधित नगरसेवकांच्या समन्वयाने काम करणार आहे. नालेसफाई, गटार स्वच्छता, पाणीपुरवठ्यातील अडचणी, पाईपलाईन गळती, खड्डे, पाणी साचणारी ठिकाणे तसेच धोकादायक झाडांच्या फांद्यांबाबत प्राप्त तक्रारींवर त्वरित कार्यवाही केली जाणार आहे. प्रत्येक पथकात १५ सदस्यांचा समावेश असून, अधिकारी, कर्मचारी, तांत्रिक मनुष्यबळ, जेसीबी, आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध राहणार आहे. स्थानिक नगरसेवक आपल्या प्रभागातील समस्या थेट पथकांसमोर मांडतील आणि त्यानुसार कामे हाती घेतली जातील. संबधित बातमी वाचा.. कोलकाता – जयपुरात मुसळधार पाऊस:रुग्णालये – दुकानांत शिरले पाणी; इंदूरचे 15 पर्यटन स्थळे बंद, UP – बिहारमध्ये उष्णतेची लाट मान्सूनच्या प्रतीक्षेत असणाऱ्या राजस्थानात गुरुवारी जोरदार पाऊस झाला. जयपूरमध्ये अर्ध्या तासात झालेल्या 50mm पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले. अनेक वाहने पाण्यामुळे बंद पडली. अनेक दुकाने-घरांमध्येही पाणी शिरले. कोलकातामध्येही अशीच परिस्थिती होती. दुपारी झालेल्या एक तासाच्या पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर एक फुटापर्यंत पाणी साचले. कोलकाताच्या SSKM रुग्णालयातही पाणी शिरले. यामुळे रुग्ण आणि त्यांची काळजी घेणाऱ्या लोकांना खूप त्रास झाला. पावसामुळे होणाऱ्या संभाव्य अपघातांची शक्यता लक्षात घेता मध्य प्रदेशातील इंदूरमधील 15 पर्यटन स्थळांमध्ये 22 ऑगस्टपर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे. राज्यातील शाजापूरमध्ये गुरुवारी वीज पडून एका वृद्धाचा मृत्यू झाला. हवामान विभागाने म्हटले आहे की, पुढील 2 ते 4 दिवसांत मान्सून संपूर्ण राज्याला व्यापू शकतो. सविस्तर वाचा
