पुणेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतिक्षित दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाले. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात मुरलीधर मोहोळ यांनी या पुलाला ‘अजित पवार’ यांचे नाव देण्याची आग्रही मागणी केली, ज्याला मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत संमती दर्शवली आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या मागणीला पाठिंबा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जुना पूल पाडून नवीन भव्य पूल उभारण्याचा धाडसी निर्णय अजित दादांनीच घेतला होता. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन काम केले. हा पूल अभियांत्रिकी कौशल्याचा एक उत्तम नमुना आहे. अजित दादांनी पुण्याच्या विकासासाठी, विशेषतः रिंग रोड आणि भुयारी मार्गांचे जाळे निर्माण करण्यासाठी सातत्याने भूमिका घेतली आहे. त्यामुळे या पुलाला त्यांचे नाव देण्यास माझे पूर्ण समर्थन असून, आम्ही निश्चितपणे हे नाव देऊ. अजितदादांनी विकासात राजकारण केले नाही केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या भाषणात अजित पवारांच्या कार्यपद्धतीचा गौरव केला. ते म्हणाले, गेल्या 8-10 वर्षांत पुण्यातील प्रत्येक मोठ्या विकासकामात अजित दादांचा सहभाग राहिला आहे. 2020 मध्ये जेव्हा या प्रकल्पाची सुरुवात झाली, तेव्हा मी महापौर होतो आणि दादा पालकमंत्री होते. त्यांनी कधीही विकासाच्या कामात राजकारण केले नाही. हा प्रकल्प त्यांच्याच संकल्पनेतून आणि दूरदृष्टीतून साकारला आहे. आज या आनंदाच्या क्षणी ते उपस्थित असायला हवे होते. त्यांच्या योगदानाची दखल घेऊनच या पुलाला त्यांचे नाव देण्याची पुणेकरांची इच्छा आहे. दादांनी पुणेकरांच्या हितासाठी अनेकदा वाईटपणा पत्करला या सोहळ्यादरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावूक झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, हा पूल पुन्हा बांधण्याचा निर्णय घेताना दादांनी पुणेकरांच्या हितासाठी अनेकदा वाईटपणा पत्करला. नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा, यासाठी ते स्वतः प्रत्येक तांत्रिक बाबीवर लक्ष ठेवून होते. आज हा प्रकल्प पूर्ण झाल्याचा मोठा आनंद आहे. दादांनी पुण्याच्या विकासासाठी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
