डॉ. बा. ज. दाते प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, नातेपुते येथे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘व्यक्तिमत्व विकास व करिअर मार्गदर्शन’ या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर येथील प्रख्यात मार्गदर्शक प्रा. आय. आय. मुजावर यांनी विद्यार्थ्यांना विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी रिल्स आणि रिअल यातील फरक समजून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन आय. आय. मुजावर यांनी केले. या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. पुढे म्हणाले की, “आय अॅम विनर, आय अॅम चॅम्पियन” हा मंत्र मनाशी बाळगल्यास कोणतेही यश प्राप्त करणे अवघड राहणार नाही. समाजात आनंद निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा. तंत्रज्ञान हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असले तरी त्याचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे. मोबाइलचा मालक न बनता त्याला आपला गुलाम बनवा, असे आवाहन त्यांनी केले. पुढे बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढवण्याचा सल्ला दिला. “माझी निर्मिती ही सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे” ही भावना मनात जोपासा. डॉक्टर, इंजिनिअर बना; मात्र त्याआधी चांगला माणूस बना. विचाराने गरीब असणाऱ्या व्यक्तीकडून मोठी कामगिरी घडत नाही. त्यामुळे पैशाने नव्हे तर विचाराने श्रीमंत बना, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी यावेळी संस्थेचे चेअरमन बाहुबली चंकेश्वरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, चांगला व्यक्ती बनण्यासाठी मनामध्ये चांगले विचार असणे आवश्यक आहे. चांगल्या विचारांसाठी सात्विक आहार महत्त्वाचा असून, जसा आहार तसा विचार निर्माण होतो. त्याचा परिणाम व्यक्तीच्या कुटुंब, करिअर आणि जीवनावर होत असतो. त्यामुळे योग्य आहार व उत्तम विचारांची जोपासना करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी बौद्धिक, शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्व विकासावर भर द्यावा. दिवसाचे नियोजन करावे, विविध करिअरच्या संधींचा शोध घ्यावा आणि पाहिलेली स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. विचारातून भावना, भावनेतून कृती आणि कृतीतून सवय निर्माण होते. त्यामुळे स्वतः इतरांसाठी आनंदाचा स्रोत बना, असा मोलाचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. या कार्यक्रमास नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बाहुबली चंकेश्वरा, व्हाईस चेअरमन संतोष काळे, प्रशाला समितीचे सभापती व संचालक अरविंद पाठक, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य नवनाथ बांगर, पर्यवेक्षक अंकुश नागरगोजे यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजीत म्हामणे यांनी केले. सूत्रसंचालन मनीषा काकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक अंकुश नागरगोजे यांनी मानले. उत्तम विचारांची जोपासना करण्याचे आवाहन
