इराणने बुधवारी बसरा जवळील खोर अल जुबैर बंदर परिसरात अमेरिकन मालकीच्या ‘सेफसी विष्णू’ या क्रूड ऑइल टँकरवर हल्ला केला. या हल्ल्यात एक भारतीय क्रू सदस्याचा मृत्यू झाला असून उर्वरित 27 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. मृत भारतीय क्रू सदस्याचे नाव नंदन प्रसाद सिंह असून ते जहाजावर अतिरिक्त मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. नंदन सिंह हे मूळचे बिहारचे रहिवासी होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून ते मुंबईतील कांदिवली येथे कुटुंबासह राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांनी यापूर्वी अनेक शिपिंग कंपन्यांमध्ये काम केले होते. त्यांच्या मेहुणे चंदन कुमार यांनी सांगितले की, कंपनीकडून मृत्यूची माहिती देण्यात आली असली तरी शिपिंग मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. नंदन सिंह यांचा मुलगा मुंबईबाहेर असल्याने तो शुक्रवारी परतल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. इराणने जबाबदरी स्वीकारली हा हल्ला 11 मार्च 2026 रोजी रात्री झाला. त्या वेळी जहाजावर सुमारे 48 हजार मेट्रिक टन नेप्था भरतानाचा ट्रान्सफर ऑपरेशन सुरू होता. प्राथमिक अहवालानुसार, स्फोटकांनी भरलेली चालकविरहित स्पीडबोट जहाजाच्या उजव्या बाजूला येऊन धडकली. या धडकेनंतर जहाजावर भीषण आग लागली. इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्ड्सने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून काही अहवालांनुसार हा हल्ला इराकच्या प्रादेशिक जलक्षेत्रात झाला. हल्ल्यानंतर जहाजावरील सर्व क्रू सदस्यांनी जीव वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. इराकच्या कोस्ट गार्डने एसटीएस टीयुजीच्या मदतीने 27 जणांची सुटका केली. यात 15 भारतीय आणि 12 फिलिपीन्सचे नागरिक होते. सर्वांना बसरा बंदराजवळील एका छोट्या बेटावर सुरक्षितपणे पोहोचवण्यात आले. भारतीय दूतावासाने सोशल मीडियाद्वारे याची माहिती देत मृत क्रू सदस्याच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. दूतावास इराकी अधिकाऱ्यांशी संपर्कात असून बचावलेल्या भारतीयांना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे. आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू भारतीय शिपिंग मंत्रालय आणि भारतीय दूतावासाने या घटनेची दखल घेत पुढील तपास आणि मदतकार्य सुरू केले आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्शियन गल्फमध्ये दोन तेलवाहू जहाजांवर अंडरवॉटर ड्रोनच्या साहाय्याने हल्ला करण्यात आला. यामध्ये ‘सेफसी विष्णू’ आणि ‘झेफिरोस’ या जहाजांचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या अमेरिका–इस्रायल–इराण संघर्षात आतापर्यंत किमान तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण जखमी झाल्याची पुष्टी झाली आहे. 12 मार्चपर्यंत या संघर्षाला 13 दिवस पूर्ण झाले असून परिस्थिती अद्याप तणावपूर्णच आहे.
