अजित पवारांच्या बाबतीत दाल में कुछ तो काला हैं:भास्कर जाधव यांचे विधान; दादांचे ‘ते’ विधान अन् त्यानंतरच्या घटनाक्रमावर वेधले लक्ष्य

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी आज पुन्हा एकदा दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूविषयी संशय व्यक्त केला आहे. अजित पवारांनी 15 जानेवारीपर्यंत जी विधाने केली होती व त्यानंतर त्यांना अप्रत्यक्षपणे दम देण्यात आला. त्यामुळे अजित पवारांचा झालेला अपघाती मृत्यू हा निव्वळ योगायोग आहे की, षडयंत्राचा भाग आहे याचा शोध तपास यंत्रणांनी घ्यायला हवा, असे ते म्हणालेत. अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले. तेव्हापासून सत्ताधारी व विरोधी बाकावरील काही आमदार हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा संशय व्यक्त करत आहेत. या आमदारांनी हा मुद्दा विधिमंडळाच्या पटलावर उपस्थित करत त्यावर चर्चा करण्याचीही मागणी केली आहे. पण सातत्याने ही चर्चा लांबणीवर टाकली जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार भास्कर जाधव यांनी उपरोक्त विधान केले आहे. ते म्हणाले, अजित पवार यांचा अपघात होता की घातपात होता? देशात व राज्यात ज्यांनी – ज्यांनी ही घटना पाहिली त्यांच्या मनात ही घटना अपघात नव्हे तर घातपातच होता अशी भावना होती व ती आजही आहे. ज्या गोष्टी व जी वक्तव्य समोर येत आहेत, त्यामुळे ही भावना अधिक दृढ होत आहे. अपघात झाला नाही तर घातपात झाला याविषयाला पुष्टी मिळत आहे, असे भास्कर जाधव म्हणाले. अजित पवारांच्या त्या विधानानंतरचा सांगितला घटनाक्रम ते पुढे म्हणाले, अजित पवारांच्या अपघाताचा विषय अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणी उथळ विधान करणे योग्य नाही. पण पहिल्या दिवसापासूनच माझ्या मनात एक विषय होता की, पिंपरी चिंचवड येथील भाषणात अजितदादांनी पहिल्यांदा सांगितले की, ज्यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले व ज्यांनी मी 70 हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला त्यांच्याच मांडीला मांडी लावून मी सरकारमध्ये बसलो आहे. अजित पवारांच्या या विधानानंतर तुम्ही एकेक मंत्र्यांची व नेत्यांची विधाने लक्षात घ्या त्यांना अप्रत्यक्ष दम दिले गेले. तुमची फाईल अजून निकालात निघाली नाही. तुमची केस कोर्टात आहे. तोंडाला लगाम लावा. त्यानंतर 15 जानेवारी रोजी अजित पवारांनी पुन्हा सांगितले की, माझ्याकडे भाजपच्या फार मोठ्या भ्रष्टाचाराची फाईल माझ्याकडे आली आहे. त्यानंतर अजित पवारांचा व शरद पवारांचा पक्ष एकत्र येत असल्याच्या बातम्या समोर आल्या. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजितदादांचा 28 जानेवारीला अपघात व्हावा हा केवळ योगायोग आहे की षडयंत्र आहे हे मी सांगू शकत नाही. या प्रकरणी तपास यंत्रणांनी खुलासा करण्याची गरज आहे. यासंबंधी आजपर्यंत महाराष्ट्र सरकारने, सरकारच्यावतीने किंवा केंद्र सरकारनेही निवेदन केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही निवेदन केले नाही. त्यामुळे दाल में कुछ तो काला है, असे भास्कर जाधव म्हणाले.

Leave a Comment

error: Content is protected !!