तारकेश्वर गडाचे महंत अदिनाथ महाराजांवर शस्त्रक्रिया यशस्वी:म्हणाले- लवकरच गडावर परत येईन; भक्तांनी रुग्णालयात येऊ नये

अहिल्यानगर जिल्ह्यातील तारकेश्वर गडाचे महंत अदिनाथ महाराज शास्त्री जखमी अवस्थेत आढळून आल्याची घटना समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. रविवारी घडलेल्या या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक भक्तांनी त्यांची तब्येत कशी आहे याची चौकशी सुरू केली होती. दरम्यान, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आता त्यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार अदिनाथ महाराज यांच्यावर आवश्यक ती शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. महंत अदिनाथ महाराज शास्त्री यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर हर्षवर्धन तनवर यांनी सांगितले की, रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून आता त्यांची प्रकृती सुधारत आहे. काही दिवस त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीनुसार त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल. डॉक्टरांनी भक्तांना विशेष आवाहन करत सांगितले की, महाराजांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये म्हणून कोणीही त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात येऊ नये. दरम्यान, रुग्णालयातून अदिनाथ महाराज शास्त्री यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. त्यांनी सांगितले की, सध्या त्यांची तब्येत स्थिर असून लवकरच ते पुन्हा तारकेश्वर गडावर परत येतील. भक्तांनी काळजी करू नये, अशीही त्यांनी विनंती केली. मात्र त्यांनी स्वतःला इजा का केली याबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. तसेच कोणालाही रुग्णालयात येऊन भेटू नये, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. रविवारी संध्याकाळी तारकेश्वर गडावर ही घटना घडली. त्या वेळी अदिनाथ महाराज आपल्या भक्तांसोबत होते. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांनी भक्तांना निरोप देत आपल्या खोलीत प्रवेश केला. काही वेळानंतर त्यांनी खोलीत स्वतःच्या अंगावर वार करून घेतल्याचे समोर आले. नंतर त्यांच्या खोलीत गेलेल्या व्यक्तींना ते जखमी अवस्थेत दिसले. त्यानंतर तातडीने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बीड जिल्ह्यात भक्तांची संख्या मोठी तारकेश्वर गडाचे महंत अदिनाथ महाराज शास्त्री यांना मानणारा मोठा भक्तवर्ग आहे. विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका तसेच बीड जिल्ह्यात त्यांच्या भक्तांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ही घटना समोर आल्यानंतर त्यांच्या अनुयायांमध्ये मोठी चिंता पसरली होती. मात्र डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनंतर आता भक्तांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून असून पुढील काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू राहणार आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!