ज्येष्ठ कवयित्री आसावरी काकडे यांचे निधन:पुण्यात अल्पशा आजाराने घेतला शेवटचा श्वास; संवेदनशील आणि प्रगल्भ आवाज हरपला

ज्येष्ठ कवयित्री आसावरी काकडे यांचे (वय 77) पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्यविश्वातील एक संवेदनशील आणि प्रगल्भ आवाज हरपला आहे. मराठी आणि हिंदीतून काव्यलेखन, अनुवाद, ललित लेखन आदी साहित्याच्या कलाप्रकारातून त्यांनी मुशाफिरी केली. आसावरी काकडे जन्म 23 जानेवारी 1949 चा. बी.कॉम.नंतर मराठी आणि तत्त्वज्ञान या दोन विषयांत एम.ए. केले. त्यानंतर त्यांनी विपुल लेखन केले. त्यांच्या त्यांच्या लिखाणाबद्दल राज्य शासनाच्या पुरस्कारासह त्यांना साहित्य अकादमीने अनुवादासाठी पुरस्कार देऊन गौरविले होते. आसावरी काकडे यांचे ‘आरसा’, ‘आकाश’, ‘लाहो’, ‘मी एक दर्शनबिंदू’, ‘रहाटाला पुन्हा गती दिलीय मी’, ‘स्त्री असण्याचा अर्थ’, ‘उत्तरार्ध’, ‘व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर’, ‘भेटे नवी राई’ आणि ‘नव्या पर्वाच्या प्रतीक्षेत’ हे कवितासंग्रह प्रसिद्ध होते. त्यांनी लहानग्यांसाठी गाणी लिहिली. त्यांचे पाच बालगीतसंग्रह प्रसिद्ध होते. त्यात ‘टिक टॉक ट्रिंग’, ‘अनु मनु शिरू’, ‘जंगल जंगल जंगलात काय?’, ‘भिंगोऱ्या भिंग’ आणि ‘ऋतुचक्र’ या पुस्तकांचा समावेश होता. आसावरी काकडे यांनी गद्यलेखनही केले. त्यांची ‘कवितेभोवतीचं अवकाश’, ‘ईशावास्यम् इदं सर्वम्ः एक आकलन-प्रवास’, ‘अथांग’ (अनुवाद), ‘आनंदी गोपाळ’ (श्री. ज. जोशी यांच्या कादंबरीचे मुलांसाटी संक्षिप्तीकरण), ‘मी माझ्या डायरीतून’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. तर त्यांनी ‘मौन क्षणों का अनुवाद’, ‘इसीलिए शायद’ आणि ‘मेरे हिस्से की यात्रा’ या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी हिंदीतूनही लेखन केले. आसावरी काकडे यांनी केलेले अनुवादही लोकप्रिय ठरले. चंद्रप्रकाश देवल यांच्या ‘बोलो माधवी’ या कवितासंग्रहाचा त्यांनी ‘बोल माधवी’ असा मराठीतून अनुवाद केला. विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या निवडक कवितांचा अनुवाद ‘तरीही काही बाकी राहील’ या कवितासंग्रहातून प्रसिद्ध झाला. तर दीप्ती नवल यांच्या ‘लम्हा लम्हा’ या कवितासंग्रहाचा आणि डॉ. दामोदर खडसे यांच्या ‘तुम लिखो कविता’ या कवितासंग्रहाचा ‘तू लिही कविता’ या नावाने त्यांनी मराठीत अनुवाद केला. त्यांच्या अनुवादाचेही रसिकांनी उत्तम स्वागत केले.

Leave a Comment

error: Content is protected !!