भाजपने केरळसह तामिळनाडू व पश्चिम बंगालमध्ये झालेल्या सत्तांतरावरून विरोधकांवर निशाणा साधला आहे. सद्यस्थितीत जनता कोणतीही ठोस विचारधारा नसलेल्या व सत्तेच्या लयलुटीत गुंतलेल्यांपासून दूर जात आहे. त्यामुळे 5 राज्यांच्या या निवडणुकीत स्वार्थ अन् घराणेशाहीत अडकलेल्या पक्षांचे शेवटचे किल्ले उखडले गेलेत, असे भाजपने या प्रकरणी म्हटले आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पद्दुचेरी या 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. त्यात पश्चिम बंगाल, आसाम व पद्दुचेरी या 5 राज्यात भाजपची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. तर केरळमध्ये काँग्रेस, तर तामिळनाडूत अभिनेते थलपती विजय यांच्या टीव्हीएम पक्षाचा विजय होण्याची शक्यता आहे. या निकालावरून महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी काँग्रेस, डावे पक्ष व बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर उपरोक्त शब्दांत निशाणा साधला आहे. सत्तेच्या लयलुटीत गुंतलेल्यांपासून जनता दूर केशव उपाध्ये आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, केरळमध्ये डाव्यांची सत्ता जाणे म्हणजे त्यांच्या शेवटच्या बालेकिल्ल्याचा पतन झाले. केरळसह तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये झालेले सत्तांतर म्हणजे केवळ सत्ता परिवर्तन नाही, तर स्वार्थ आणि घराणेशाहीत अडकलेल्या पक्षांचे शेवटचे किल्ले उखडले गेले आहेत. कोणतीही ठोस विचारधारा नसलेल्या आणि सत्तेच्या लयलुटीत गुंतलेल्यांपासून जनता आता दूर जात आहे. विकास, सुशासन आणि परिणामकारक नेतृत्वाच्या दिशेने वाटचाल करण्याचा निर्णय मतदार घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या मार्गावर जाण्याचा कौल जनतेने दिला आहे, हाच या निकालाचा खरा अर्थ आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगालमध्ये झाला खरा चमत्कार केशव उपाध्ये यांनी या निवडणुकीत खरा चमत्कार हा पश्चिम बंगालमध्ये झाल्याचाही दावा केला. खरं ठरलं..चार मई, ममता गई! आसाम आणि पुड्डूचेरी मध्ये भाजपाची सत्ता कायम राहणार हे निश्चित होतं, पण खरा चमत्कार झाला तो पश्चिम बंगालमध्ये ! पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमितभाई शाह यांची व्यूहरचना सफल झाली असून भाजपावर संपूर्ण पश्चिम बंगालच्या जनतेने पूर्ण विश्वास टाकला आहे. पश्चिम बंगालमधील बेरोजगारी, घुसखोरी, गुंडाराज आता संपणार असून भारताची सीमा देखील सुरक्षित होणार आहे ! चप्पा-चप्पा, भाजपा, असे त्यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये अखेर भाजपाचे कमळ फुले चार राज्यांपैकी सर्वाधिक लक्ष होते पश्चिम बंगालकडे. पश्चिम बंगालची सत्ता मिळवण्यात भाजपाला यश आले आहे. 11.30 पर्यंतच्या मतमोजणीनंतर भाजपाने तब्बल 156 जागांवर आघाडी घेतली आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. तृणमूल काँग्रेस 84 जागांवर आघाडीवर असून, बीजीपीएम, एजेयूपी आणि सीपीआय (एम) यांनी प्रत्येकी एका जागेवर आघाडी घेतलेली आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेसाठी 147 बहुमताचा आकडा आहे. भाजपाने आतापर्यंत 156 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे ममतांना सत्तेवरून खाली खेचण्यात भाजपाला यश आल्याचे दिसत आहे.
