एसटी महामंडळात 17,742 पदांची कंत्राटी मेगाभरती:8300 नवीन बसेससाठी चालक-वाहकांची नियुक्ती; प्रताप सरनाईकांची घोषणा

राज्याची जीवनवाहिनी असलेल्या ‘लालपरी’चा विस्तार करण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणाऱ्या ८३०० नवीन बसेस चालवण्यासाठी १७ हजार ७४२ चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार असल्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत केली. प्रवाशांना विनाअडथळा सेवा देणे हा या भरतीमागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, “नियमित कर्मचारी भरतीसाठीचा प्रस्ताव अर्थ विभागाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, नवीन बसेस ताफ्यात येण्यास सुरुवात झाली असून, त्या डेपोमध्ये उभ्या न राहता रस्त्यावर धावणे गरजेचे आहे. त्यामुळे ही नियमित प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल.” “महामंडळाच्या ताफ्यात आम्ही लवकरच 8300 बसेस समाविष्ट करणार आहोत. त्यासाठी, एसटी महामंडळात 17,742 ड्रायव्हर, कंडक्टर आणि कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती केली जाणार आहे. महामंडळाच्या ताफ्यात नव्याने येणाऱ्या 8300 बसेससाठी ही कंत्राटी भरती केली जाईल,” असे प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत बोलताना सांगितले. मुंबईकरांसाठी ‘लोकल’ ते ‘लक्झरी’ प्रवास मुंबईतील प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळाने खास पावले उचलली आहेत. लवकरच मुंबईच्या ताफ्यात ३० स्लीपिंग कोच आणि १७० वातानुकूलित (Volvo) बसेस दाखल होणार आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या बसेस अत्यंत सोयीस्कर ठरणार आहेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट महायुती सरकारने एसटी प्रवाशांसोबतच आता कर्मचाऱ्यांच्या कल्याणाकडेही लक्ष दिले आहे. यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आणि महिलांना ५० टक्के सवलत दिल्यानंतर, आता एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पत्नीसह वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांच्या सेवेचा सन्मान म्हणून हा निर्णय घेतल्याचे प्रताप सरनाईक यांनी नमूद केले. शिस्तभंग कारवाईत पारदर्शकता येणार कर्मचारी संघटनांच्या बैठकीत चालक-वाहकांना येणाऱ्या दैनंदिन अडचणींवरही चर्चा झाली. आगार स्तरावर (डेपो) होणारी निर्णयप्रक्रिया आणि कर्मचाऱ्यांवरील शिस्तभंग कारवाईच्या बाबतीत न्याय्य आणि पारदर्शक पद्धती अवलंबण्याचे निर्देश प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला दिले आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी विधानभवनात सोमवारी विशेष बैठकही पार पडली. हे ही वाचा… राज्यात ६ हजारांहून अधिक प्राध्यापक भरती:विद्यापीठांना ७००, अनुदानित महाविद्यालयांना ५४०० प्राध्यापक मिळणार – चंद्रकांत पाटील राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता नव्या महाविद्यालयांना अनुदानित तत्वावर परवानगी न देण्याबाबतच्या धोरणात बदल करणे शक्य नाही. मात्र अनुदानित महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्राध्यापक भरती केली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली. सविस्तर वाचा…

Leave a Comment

error: Content is protected !!